सिंधुदुर्गातील १६ गावे जोखीमग्रस्त जाहीर, साथ रोगाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:45 IST2025-05-28T18:45:14+5:302025-05-28T18:45:53+5:30
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग साथ रोगाच्या नियंत्रणासाठी सतर्क झाला असून, मागील तीन वर्षांत ज्या ठिकाणी लेप्टोचे ...

संग्रहित छाया
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग साथ रोगाच्या नियंत्रणासाठी सतर्क झाला असून, मागील तीन वर्षांत ज्या ठिकाणी लेप्टोचे रुग्ण आढळले, अशी १३ गावे व जलजन्य साथीची ३ गावे अशी एकूण जिल्ह्यातील १६ गावे जोखीमग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी कालावधीत लेप्टो आणि जलजन्य आजार उद्भवतात. गेल्या तीन वर्षांत ज्या गावांमध्ये लेप्टोचे व जलजन्य आजाराचे रुग्ण आढळले, अशी गावे जोखीमग्रस्त म्हणून जाहीर करून, या गावात विशेष लक्ष दिले जाणार आहे.
त्यानुसार, या वर्षी देवगड तालुक्यातील रामेश्वर, कणकवली तालुक्यातील हळवळ व वागदे, मालवण तालुक्यातील चिंदर, कुडाळ तालुक्यातील किनळोस धनगरवाडा, घावनळे, तेंडोली, रानबांबुळी, धुरिटेमनगर, वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा, वेतोरे, सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, तळवडे परबवाडी अशी १३ गावे तर जलजन्य आजारासाठी कणकवली तालुक्यातील कोळोशी, वेंगुर्ला तालुक्यातील कनयाळ, गावतळे अशा ३ गावांचा समावेश आहे.
संपूर्ण जिल्ह्यात उपाययोजना : डॉ.सई धुरी
- जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला साथरोग फैलावतात. त्यामध्ये लेप्टो, जलजन्य आजाराचे रुग्ण आढळतात. आरोग्य विभाग या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन करते.
- त्यानुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात उपाययोजना राबविल्या जातात. त्यासाठी आवश्यक असलेली औषधे आणि आवश्यक साहित्य सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध करून दिली जातात.
साथरोगांच्या नियंत्रणासाठी पूर्व तयारी, नियोजन
- या वर्षीही आरोग्य विभागाने साथ रोगांच्या नियंत्रणासाठी पूर्व तयारी व नियोजन केले आहे. ज्या गावात मागील तीन वर्षे साथीचे रुग्ण आढळले, अशी १६ गावे जोखीम ग्रस्त गावे जाहीर केली आहेत.
- या गांवामध्ये विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे, तर संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे. कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण आणि पुरेसा औषध साठा उपलब्ध करून दिला आहे.
- तसेच आपत्ती कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांनी दिली.