‘त्यांच्या’साठी माणुसकी जागली, जेव्हा ‘माउली’ धावली; साताऱ्यातील कॉलेज तरुण-तरुणी करतात गरजू विद्यार्थ्यांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:12 IST2026-01-27T13:12:42+5:302026-01-27T13:12:53+5:30
वाढदिवसाला वाया जाणारे पैसे एकत्र करून त्यातून समाजातील वंचित घटकांना मदत करावी, अशी संकल्पना मांडली. त्याला सर्वांची संमती मिळाली.

‘त्यांच्या’साठी माणुसकी जागली, जेव्हा ‘माउली’ धावली; साताऱ्यातील कॉलेज तरुण-तरुणी करतात गरजू विद्यार्थ्यांना मदत
विकी जाधव
सातारा : समाजसेवा करायची आवड असेल तर ‘सवड नाही’ म्हणून चालत नाही. हीच आवड अंगी बाळगून साताऱ्यातील शिवाजी कॉलेजच्या काही निवडक तरुण-तरुणींनी एकत्र येत समाजातील निराधाचीरां सेवा अन् समाजोपयोगी कार्यासाठी ‘माउली फाउंडेशन’ची स्थापना केली आहे. त्याच निराधारांच्या सेवेतून माउली फाउंडेशनचा आज ‘समाजसेवेचा झरा’ खळखळ वाहतोय.
छत्रपती शिवाजी कॉलेजमधील २०१५ च्या बॅचमधील काही निवडक विद्यार्थ्यांनी वाढदिवसाला वाया जाणारे पैसे एकत्र करून त्यातून समाजातील वंचित घटकांना मदत करावी, अशी संकल्पना मांडली. त्याला सर्वांची संमती मिळाली. त्यानुसार पुढे वाढदिवसाचे पैसे एकत्र करून साताऱ्यातील बालसुधारगृह, माहुलीतील वृद्धाश्रम, तसेच मतिमंद मुलांसाठी असलेली ‘आशा भवन’ ही शाळा आणि उपरी येथील मतिमंद मुलांचे आश्रम या ठिकाणी मदत करायला सुरुवात केली. हे फाउंडेशन आता शाळेतील गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना दत्तक घेऊन, त्यांना वर्षभर लागणाऱ्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप करून बांधीलकी जपत आहे.
‘माउली’ने ‘शिक्षणाची सायकल’ हा उपक्रम नव्याने हाती घेतला असून, याद्वारे शहरातील न वापरल्या जाणाऱ्या सायकली दुरुस्त करून, त्या ग्रामीण भागातील शाळेपासून तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. सध्या फाउंडेशनद्वारे पुण्यामध्ये २५ मुलींना वार्षिक ३५ हजार रुपये स्कॉलरशिप दिली जात असून, वर्षभर दर रविवारी त्यांना कौशल्य विकासासाठीचे प्रशिक्षण दिले जाते.
‘माउली’शी जोडले गेलेले तरुण-तरुणी
मनीष करपे, विजय शिंदे, अक्रम मणेर, आरती कर्पे, तेजश्री पाटील, मर्जिना मणेर, अमोल गावडे, प्रशांत सोनवले, सुधीर फडतरे, निशांत पवार, प्रतीक्षा सोनवणे, अक्षय पवार, शुभम खरात, मयूर खराडे, आदी तरुण-तरुणी ‘माउली फाउंडेशन’शी जोडले गेले आहेत.
स्वतःच्या पगारातून हातभार
फाउंडेशनचे सदस्य कॉलेजजीवनापासून स्वत:च्या पगारातून का असेना, जमेल तशी रक्कम फाउंडेशनला दान करतात. नोंदणीनंतर ‘मासिक देणगीदार’ ही संकल्पना राबवली गेली, त्यामुळे दर महिन्याला ५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत मदत करणारे देणगीदारही संस्थेशी जोडले गेले आहेत.