नीरा नदी काठी माऊलींचे आनंदाचे डोही आनंद तरंग, माऊलीच्या जयघोषात पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:27 IST2025-06-26T15:27:14+5:302025-06-26T15:27:34+5:30
वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे भक्तांना सुरक्षित भागातच स्नान करावे लागले

नीरा नदी काठी माऊलींचे आनंदाचे डोही आनंद तरंग, माऊलीच्या जयघोषात पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश
विकास शिंदे
फलटण : नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी!
अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!
'ग्यानबा-तुकाराम' नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज गुरुवारी माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला. तत्पूर्वी नीरा नदीच्या पवित्र पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी उपस्थित माऊली भक्तांनी माऊली माऊलीचा जयघोष करत टाळ मृदुगांच्या आवाजाने नीरा नदीच पात्र दुमदुमून सोडलं.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला परंपरागत महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सीमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात.
दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पालखी सोहळ्याने जुन्या नीरा पुलावरून दत्त घाटावर प्रवेश केला टाळ व मृदुगाच्या जयघोषा बरोबर माऊलींच्या पादुका स्नानासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळी बरोबर वाद्यांचा निनाद सुरू होता पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांना स्नान घातले गेले यानंतर प्रशासना तर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
माऊलींना शाही स्नान व पाद्य पूजा
पादुकांना शाही स्नान घालून माऊलींच्या पादुकांना चंदन उटी व तुळशीहार अर्पण करून पाद्य पूजन करण्यात आले यानंतर सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. परंपरे प्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर माऊलींच्या पादुकांचे दत्त घाटावर शाही स्नान सुरू होते. भक्तांचेही स्नान झाले व सोहळ्याला नवी ऊर्जा मिळाली.
नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ
या वर्षी वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे नीरा दत्त घाटावर पाणी आले होते. त्यामुळे दरवर्षी मनसोक्त नीरा स्नान करणाऱ्या भक्तांना सुरक्षित भागातच स्नान करावे लागले.