सातारा : धरणक्षेत्रात पाऊस जोर धरु लागला, कोयनेत ३१ मिलीमिटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:53 IST2018-06-18T13:53:30+5:302018-06-18T13:53:30+5:30
गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा सुरूवात केली असून धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळत आहेत.

सातारा : धरणक्षेत्रात पाऊस जोर धरु लागला, कोयनेत ३१ मिलीमिटर पाऊस
सातारा : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा सुरूवात केली असून धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळत आहेत.
मान्सूनचे वेळेत आगमन झाले असताना सुरूवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला. दुष्काळी भागातही पाणी वाहिले. पण, त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे ढग दाटून आले. खरीप हंगामातील पेरणी वेळेत होणार का याकडे लक्ष लागले होते.
आता काही दिवसांच्या दडीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. सातारा शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. सोमवारी सकाळीही हलकासा पाऊस झाला. तर दुष्काळी भागातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
पावसाचा खरा परिणाम होतो तो धरणातील पाणीसाठ्यावर. पाऊस वेळेत झाला साठ्यात वाढ होऊन धरणे लवकर भरतात. यंदा अद्यापही धरणात पाण्याची आवक झालेली नाही. असे असलेतरी सध्या सुरू असलेल्या पावसाने रात्रीपासून धरणक्षेत्रात हळूहळू जोर धरल्याचे दिसत आहे. यामुळे लवकरच धरणात पाण्याची आवक होण्यास सुरूवात होणार आहे.
सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३१ मिलीमिटर पाऊस झाला. तर रविवारी सकाळपर्यंत येथे अवघा १४ मिलीमिटर पाऊस झालेला. त्यामुळे कोयना परिसरात पाऊस जोर धरत असल्याचे दिसत आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊस
- धोम ०६ (५३)
- कोयना ३१ (३४७)
- बलकवडी १९ (१४७)
- कण्हेर ०५ (३३)
- उरमोडी १० (४३)
- तारळी ३० (८३)