पाउस पडला; कोयनेतून सांगलीचे पाणी बंद; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम 

By नितीन काळेल | Updated: September 27, 2023 18:49 IST2023-09-27T18:48:41+5:302023-09-27T18:49:22+5:30

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू ...

Sangli water shut off from Koyna dam; Waiting for heavy rain in satara | पाउस पडला; कोयनेतून सांगलीचे पाणी बंद; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम 

पाउस पडला; कोयनेतून सांगलीचे पाणी बंद; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम 

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू लागला असून सकाळच्या सुमारास ९२ टीएमसीवर पोहोचला होता. तर सातारा जिल्ह्यात परतीचा पाउस पडत असलातरी पूर्व भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यात पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही आतापर्यंत सरासरीच्या ६० टक्क्यांच्या आसपासच पाउस पडला आहे. त्यातील दोन महिने हे कमी पावसाचे राहिले. फक्त जुलृ महिन्यातच चांगला पाउस झालेला. त्यामुळे पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख पाणी प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला होता. मात्र, आंगस्ट आणि सप्टेंबर महिन्याने निराशा केली. या दोन महिन्यात कमीच पर्जन्यमान झाले.

आतातर पावसाळा संपत आला आहे. तरीही पाउस कमी असल्याने चिंता वाढलेली आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगरला ५ आणि नवजाला ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला १६ मिलीमीटर पाउस पडला आहे. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३९२२, नवजा ५५४९ आणि महाबळेश्वरला ५३४३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर बुधवारी सकाळच्या सुमारास काेयनेत ३९७५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात ९२.३८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. हे प्रमाण ८७.७७ टक्के इतके झाले आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १३ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक धरणांतून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तर सध्या परतीचा पाउस सुरू असलातरी पश्चिम भागात प्रमाण कमी आहे. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यात पाउस पडत आहे. पण, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अजुनही ओढ्यांना पाणी नाही. बंधारे भरलेले नाहीत. परतीचा पाउस चांगला झाल्यास रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.

सांगलीला दोनवेळा सोडले पाणी...

कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. आतापर्यंत दोनवेळा सांगलीसाठी कोयनेतून विसर्ग करण्यात आलेला. पाच दिवसांपूर्वी सांगलीसाठी कोयनेतून सुरुवातीला १०५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मागणी वाढल्याने आणखी विसर्ग वाढवून २१०० क्यूसेक करण्यात आला. पण, गेल्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यात पाउस झाल्याने मंगळवारी रात्रीपासून सांगलीचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

Web Title: Sangli water shut off from Koyna dam; Waiting for heavy rain in satara