Satara News: नीरा-देवघरच्या पाण्यावरून रणकंदन, रामराजेंचा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर घणाघात, म्हणाले..

By दीपक शिंदे | Published: February 27, 2023 06:34 PM2023-02-27T18:34:48+5:302023-02-27T18:39:13+5:30

..बघूया जनता कोणाला साथ देते

Rankandan over the waters of Nira Deoghar in Phaltan, Ramraj criticism of Ranjit Singh Naik Nimbalkar | Satara News: नीरा-देवघरच्या पाण्यावरून रणकंदन, रामराजेंचा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर घणाघात, म्हणाले..

Satara News: नीरा-देवघरच्या पाण्यावरून रणकंदन, रामराजेंचा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर घणाघात, म्हणाले..

googlenewsNext

फलटण : ‘कृष्णा खोऱ्यातील पाणी आम्ही मेहनतीने अडविले असून, आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे करीत आहेत, आम्ही पाणी अडवून धरणे बांधली, पुनर्वसन केले, कामे सुरू केली, सर्व काय आम्ही शिजवलं आणि याला फोडणी द्यायचं काम विरोधक करीत आहेत. रणजितसिंह जलनायक नसून खलनायक आहेत,’ असा घणाघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केला.

सध्या नीरा-देवघरच्या पाण्यावरून फलटण तालुक्यात रणकंदन माजले आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘कृष्णा खोऱ्यामध्ये आम्ही लवादाच्या कचाट्यातून पाणी अडविण्याचे काम वेळेत केल्याने तब्बल ८१ टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यात मिळाले आहे. नीरा-देवघर धरणाचे काम आम्हीच पूर्ण केले. खंडाळा तालुक्यापर्यंत कालव्याद्वारे याचे पाणी आम्ही आणले. पुढील काम पूर्ण होईपर्यंत ५५ टक्के पाणी बारामतीला आणि ४५ टक्के पाणी फलटणला मिळत होते. आपल्या तालुक्याला हे पाणी पुरत असताना यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला. खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह आणि आमदार जयकुमार गोरे यांनी बारामतीला जाणाऱ्या पाण्याला विरोध करून पूर्वीचा जीआर बदलायला लावला. यामुळे नीरा-देवघरचे पाणी आपल्या तालुक्याला मिळणार नाही, त्यांची ही मोठी चूक आहे.

नीरा-देवघर क्षेत्रात भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस हे तालुके आहेत. या तालुक्यांची तहान भागून इतर तालुक्याला पाणी देण्यास आपला कसलाही विरोध नाही. आता नीरा-देवघरच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी खासदारांच्या चुकीमुळे याचे पाणी फलटण तालुक्याला न मिळता माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यांना मिळणार आहे. मोठ्या कष्टाने नीरा-देवघरचे जे धरण आम्ही तालुक्यासाठी बांधले, त्या तालुक्याला पाणी मिळत नसेल तर काहीच अर्थ राहणार नाही. सांगोल्याला पाणी देण्यास माझा विरोध नाही; मात्र फलटणची तहान भागून उरलेले पाणी त्यांना दिले तर हरकत नाही, या मताचा मी आहे. सांगोला तालुक्याचा दुष्काळ मिटावा म्हणून मी टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण करून सांगोला तालुक्याला पाणी दिलेले आहे, हे तेथील जनतेने विसरू नये.’

..तर राजीनामा देऊन विधानसभा लढवावी

नीरा-देवघरचे कालव्याचे काम रखडल्याने धोम-बलकवडीचे कालव्याचे काम पूर्ण करून दुष्काळी पट्ट्यात पाणी आणले. या पाण्याच्या जोरावरच खासदार रणजितसिंहांचा स्वराज आणि शरयू हे कारखाने उभे राहिले आहेत, हे विसरू नये. दिशाभूल करून राजकारण करण्याचा आणि आरोप करण्याचा प्रकार खासदार रणजितसिंह यांच्याकडून सतत सुरू असून, हिंमत असेल तर रणजितसिंहांनी राजीनामा देऊन विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवावी, आम्हीही लढवितो. बघूया येथील जनता कोणाला साथ देते, असे आव्हान रामराजे यांनी दिले.

Web Title: Rankandan over the waters of Nira Deoghar in Phaltan, Ramraj criticism of Ranjit Singh Naik Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.