डोंगर पेटवणार ‘तो’ कोठडीमध्ये जाणार!, बहुतांश ठिकाणी वनव्याचे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:28 IST2026-02-14T19:27:15+5:302026-02-14T19:28:06+5:30
आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक प्राण्यांना हकनाक जीव गमवावा लागतो.

संग्रहित छाया
पेट्री : वनसंपदेने आच्छादलेल्या डोंगररांगांमध्ये हिवाळा संपू लागला की वणवे लावले जातात. जिल्ह्यात माळरान, गवताळ भागात वनसंपदा मोठी आहे. मात्र दरवर्षी वणव्यात वनसंपदेला हानी पोहोचते. वृक्ष, सरपटणारे जीव, प्राणीपक्ष्यांची आश्रयस्थाने वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडतात. वणवा लावणाऱ्यांवर पाच हजार रूपये दंड व एक वर्ष कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे.
वनसंपदा मोठी असल्याने वनविभागाच्या जागेचा संबधित भाग आरक्षित केला जातो. फिरणाऱ्यांकडून जळत असलेली सिगारेट किंवा पेटती काडी पडल्यास गवताला आग लागून वणवा लागण्याची शक्यता असते. वनक्षेत्रात लागलेला वणवा नियंत्रणात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक प्राण्यांना हकनाक जीव गमवावा लागतो.
वनविभागाकडून वणवा नियंत्रणासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम हाती घेतले जातात.
बऱ्याचदा वणव्याची माहिती वनविभागापर्यंत उशिरा मिळाल्यामुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान होते. वनक्षेत्रात जाळरेषा आखण्यात आल्या आहेत. वाळलेले गवत काढून टाकण्यात येते. वणवा लागू नये म्हणून वनकर्मचाऱ्यांना मार्गदर्शनसुद्धा केले जाते.
भारतीय वन अधिनियमानुसार वणवा लावणे गंभीर गुन्हा आहे. वनसंपदेचा नाश, प्राण्यांचे अस्तित्वही धोक्यात येते. वनांचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी वनविभागातर्फे जाळरेषेसह विविध प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात.
गवत किंवा झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात. जमिनीतील पाणीपातळीत वाढ होऊन जलस्रोत वाढतात. गवतामुळे माती वाहून जात नाही. उन्हाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. पशुपक्ष्यांचे निसर्गचित्र सुधारते. वनक्षेत्र हिरवेगार राहिल्यास मानव वन्यप्राणी संघर्ष टळतो. शेतकऱ्यांच्या जनावरांनाही मुबलक चारा मिळाल्यास दूध चांगले मिळते.
वणवा लागू नये म्हणून वनविभागाच्या जागेशेजारील शेतीचा बांध जळताना वनकार्यालयाला याविषयी माहिती देणे आवश्यक आहे. वनात फिरायला जाताना आग लागेल अशा वस्तू सोबत घेऊन जाऊ नयेत. कोणत्याही कारणाने आग लावण्याचा प्रयत्न करू नये. झाडे, गवत, माळरान असणाऱ्या जागेतून जाताना रस्त्याने सिगारेट ओढू नये.
उन्हाळा सुरू झाला की गुरांसाठीचे गवत काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग असते. उरलेल्या चाऱ्याला पेटवून देण्याचा कार्यक्रम ग्रामीण भागांमध्ये सुरू होतो. हे टाळायचे असेल तर वन विभागाच्या वतीने जाळरेषा काढली जाते. ही जाळरेषा काढल्यास आग मोठ्या प्रमाणावर पसरण्यापासून वाचते.
रात्रीच्या अंधारात खेळ चाले
जुन्या पद्धतीनुसार जोपर्यंत डोंगर जाळले जात नाही, तोपर्यंत जनावरांना खायला चांगला चारा मिळणार नाही. अशा धारणेमुळे डोंगरांना वणवे लावले जातात. घरातील जनावरांचे खाद्य काढून उरलेला चारा जाळला जातो. आता जनावरे फार नसली तरीही रात्रीच्या अंधारात पेटलेला डोंगर पाहण्याचा विकृत आनंद घेण्यासाठीही वणवा लावला जातो.
वनव्यात कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, झाडेझुडपे जळून खाक होतात. त्यांचे अधिवास उद्ध्वस्त होऊन ते प्राणी बेघर होतात. त्यामुळे वणवा लावण्यापूर्वी या मुक्या जीवांचा संवेदनशीलपणे विचार करावा. - संदीप जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सातारा-जावळी