Satara ZP Election 2026: विरोधकांकडून आपली राजेशाही जिवंत ठेवण्यासाठी राजकारण, जयकुमार गोरे यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 19:49 IST2026-01-24T19:49:10+5:302026-01-24T19:49:49+5:30
पाडेगाव येथे आयोजित केलेल्या सभेत विरोधकांवर टीका

Satara ZP Election 2026: विरोधकांकडून आपली राजेशाही जिवंत ठेवण्यासाठी राजकारण, जयकुमार गोरे यांचे टीकास्त्र
तरडगाव : ‘लोकं आपले गुलाम आहेत. त्यांना आपली गरज आहे, असे मानून विरोधकांनी आजवर विकासाभिमुख राजकारण न करता केवळ आपली राजेशाही जिवंत ठेवण्यासाठी राजकारण केले,’ अशी टीका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरडगाव जिल्हा परिषद गटातील भाजप मित्र पक्षाचे उमेदवार प्रचारार्थ पाडेगाव येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जयकुमार गोरे म्हणाले, ‘सर्वत्र लोकशाही असताना यांची राजेशाही अजून संपली नाही. यामुळे फलटण तालुका मागासलेला राहिला. सातत्याने अनेक सत्तास्थाने मिळूनही ते लोकांच्या गरजा पूर्ण करू शकले नाहीत. त्यांना राजकारण करण्याचा अधिकार राहिला नाही. गावागावांतील जनतेने त्यांचा कार्यक्रम करण्याचे ठरविले आहे.
या भागातील १५ वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीला त्यांनी लेटर पॅड व सह्यांचा अधिकारी दिला नाही. त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या. तरडगाव भागातील शिंदेमाळ ग्रामस्थ हे १५ वर्षे शेतीसाठी डीपी मागत होते. ते देऊ शकले नाहीत. तुम्ही माण तालुक्यात असता तर मी तो पंधरा मिनिटांत दिला असता,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी तरडगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सूर्यकांत खरात, पाडेगाव गणाचे उमेदवार अमोल खराडे, तरडगाव गणाचे उमेदवार स्मिता गायकवाड, डॉ. नितीन सावंत, माणिकराव सोनवलकर, धनंजय साळुंखे-पाटील, विक्रम भोसले, वसंतराव ठोंबरे, राजेश खरात, सिराज शेख, अतुल गायकवाड, प्रशांत गायकवाड, गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.
१५ महिने दम निघाला नाही..
मी पंधरा वर्षे कोणाला झुकलो नाही. यांना पंधरा महिने दम निघाला नाही. आम्ही स्वीकारले नाही की गेले दुसरीकडे. ते कोणत्या पक्षात आहेत हे त्यांच्याबरोबर जनतेलाही समजेना. आता पाटण, वाईतून कोणी आले तरी काही फरक पडत नाही, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावत ३० वर्षांनी फलटणला स्वातंत्र्य मिळालं असून जनतेने आग लावणाऱ्यांपासून दूर राहावे, असे सांगितले.