Satara: उत्तर-दक्षिण भारत, दुबई ट्रीपच्या आमिषाने १५ लाखांना गंडा; सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 19:43 IST2025-07-10T19:42:39+5:302025-07-10T19:43:13+5:30
३६ लोकांची फसवणूक..

Satara: उत्तर-दक्षिण भारत, दुबई ट्रीपच्या आमिषाने १५ लाखांना गंडा; सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा
सातारा : उत्तर आणि दक्षिण भारत तसेच दुबईत कंपनीची ट्रीप जाणार आहे म्हणून बुकींसाठी पैसे घेऊन १५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी जयवंत रामचंद्र वारागडे (वय ५९, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मयुरेश वाघ, काजल निमसे, सपना वाघ, शुभांगी कदम, अनुजा आणि सुवर्णा भालेराव (संपूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, मागीलवर्षी ३० जून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत हा प्रकार घडलेला आहे. संशयितांनी उत्तर भारत, दक्षिण भारत, गंगासागर तसेच दुबई या ठिकाणी कंपनीची ट्रीप जाणार आहे असे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीकडून बुकींगसाठी पैसे घेतले.
अशाप्रकारे १५ लाख ३६ हजार ९५० रुपये घेण्यात आले होते. पण, नंतर ट्रीपला नेले नाही. तसेच सहलीसाठी घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच पुढील तपास सुरू झाला आहे.
३६ लोकांची फसवणूक..
ट्रीपला जाण्यासाठी पैसे घेण्याचा प्रकार घडला आहे. पण, संबंधितांना सहलीसाठी नेण्यात आले नाही. जवळपास ३६ लोकांची यामध्ये फसवणूक झाल्याचे दिसून आले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आणखी ३६ जणांचीही फसवणूक झाल्याचे स्पष्ट केलेले आहे. यामुळे फसवणूक झाल्याचा आणि रकमेचाही आकडा वाढणार आहे.