Satara ZP Election 2026: औंधसह २१ गावांच्या पाण्यासाठी कोणाच्या कुबड्यांची गरज नाही - जयकुमार गोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:02 IST2026-02-05T18:01:31+5:302026-02-05T18:02:10+5:30
माण-खटावची मातीच आमचा स्वाभिमान

Satara ZP Election 2026: औंधसह २१ गावांच्या पाण्यासाठी कोणाच्या कुबड्यांची गरज नाही - जयकुमार गोरे
सातारा : केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांनी जनतेच्या जीवनात स्थिरता आणली आहे. आज गावोगावी विकासाचे पर्व उभे राहिले आहे. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून माण-खटाव मतदारसंघात आमूलाग्र कायापालट होत आहे. पाणी योजनांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. आता औंधसह २१ गावांच्या योजनेची मान्यता होऊन तीन वर्षांत या योजनेचे पाणी देणार आहे. त्यासाठी कोणाच्या कुबड्यांची गरज नाही, असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. आम्ही कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. माण-खटावची मातीच आमचा स्वाभिमान असल्याचेही ते म्हणाले.
कुरोली येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अंकुशभाऊ गोरे, सोनिया गोरे, झेडपीच्या उमेदवार भारतीताई गोरे, शहाजी देशमुख, दादासाहेब इंगळे, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गोरे म्हणाले, माण-खटावच्या जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील युवकावर विश्वास ठेवून चार वेळा आमदार आणि आता राज्याचे मंत्री केले आहे. अथक प्रयत्नांनी दुष्काळी माण-खटावला विकसित करण्याचा शब्द पूर्णत्वाला नेला आहे. इथल्या जनतेलाच नव्हे तर नेत्यांनाही विचारात घेतले जात नव्हते, मात्र आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची पाने माझ्या माण-खटावमधून हलू लागली आहेत.
अहोरात्र जनतेची सेवा करत उरमोडी, जिहे-कठापूरचे पाणी आणलेय. टेंभूची कामे प्रगतिपथावर आहेत. शेतकरी बागायती शेती करू लागले आहेत. कारखाने सुरू झाले आहेत. आता माझ्या मतदारसंघात एमआयडीसी होत आहे. शक्तिपीठ महामार्ग मतदारसंघातून जात असल्याने विकासाची अनेक दालने खुली होणार आहेत.
भाजपचा विकासाभिमुख कारभार : भारतीताई गोरे
भाजप सरकारच्या विकासाभिमुख कारभारावर विश्वास ठेवून सभेस उपस्थित असणारा महिला भगिनी आणि आबालवृद्धांचा जनसमुदाय पाहता कमळ चिन्हावरील सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असा भारतीताई गोरे यांनी विश्वास व्यक्त केला.
यापुढे पाणीप्रश्नावर निवडणूक नाही...
मी माण-खटावचा पारंपरिक दुष्काळी अजेंडा बदलून दाखवला आहे. पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागात पाणी येणार नाही, असे हिणवले जायचे. मात्र मी जीवाची बाजी लावून परिश्रम करून मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणले आहे. फेरजल नियोजनातून वाढीव पाणी मिळवले आहे. आता औंधसह २१ गावांची पाणी योजना राज्यपालांकडून मान्य होईल. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील काही अपवाद वगळता सगळी गावे सुजलाम होतील. यापुढील कोणतीही निवडणूक येथील पाणीप्रश्नावर लढली जाणार नाही, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला.