माण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रावर कोरोनाची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:38 IST2020-12-03T16:37:11+5:302020-12-03T16:38:59+5:30
Coronavirusunlock, School, Education Sector, Satara area लॉकडाऊननंतर २३ नोव्हेंबर रोजी नववी, दहावीच्या शाळा सुरू झालेल्या असल्या तरी दिवसेंदिवस शाळांचा पट रोडावत चालला आहे. देवापूर येथील शाळेत विद्यार्थिनी कोरोनाबाधित सापडल्याने शाळा बंद करण्यात आली आहे. नऊ गावांत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन उमदे प्राथमिक शिक्षक कोरोनाचे बळी ठरल्याने शैक्षणिक क्षेत्रावर भीतीचे सावट आहे.

वरकुटे-मलवडीतील यशवंतराव चव्हाण हायस्कूल बंद असल्याने नेहमी वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)
वरकुटे-मलवडी : लॉकडाऊननंतर २३ नोव्हेंबर रोजी नववी, दहावीच्या शाळा सुरू झालेल्या असल्या तरी दिवसेंदिवस शाळांचा पट रोडावत चालला आहे. देवापूर येथील शाळेत विद्यार्थिनी कोरोनाबाधित सापडल्याने शाळा बंद करण्यात आली आहे. नऊ गावांत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन उमदे प्राथमिक शिक्षक कोरोनाचे बळी ठरल्याने शैक्षणिक क्षेत्रावर भीतीचे सावट आहे.
मागील काही दिवसांत गौरी-गणपती, दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प होती. त्यातच कोरोनाच्या भीतीने दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या संख्येत घटच होऊ लागली आहे.
कोरोनाची काळजी घेताना शाळांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमावलींंचे काटेकोर पालन होत नाही. शाळेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून तसे प्रमाणपत्र शाळा प्रशासनाला सादर केले आहे. मात्र, यापुढे कोणीच कोरोनाबाधित होणार नाही, याची खात्री देणार कोण? हा गहन प्रश्न आहे.
शाळेत येणारे शिक्षक व विद्यार्थी नानाविध ठिकाणांहून येतात, त्यामुळे चिंतेत भर पडत आहे. पालकांनी संमतीपत्र देऊनही अनेक विद्यार्थी अनुपस्थित राहत आहेत. ऑनलाईन जेवढे विद्यार्थी हजर राहत होते, त्याच्या निम्मेसुद्धा विद्यार्थी शाळा सुरू झाल्यापासून उपस्थित राहत नाहीत, अशी परिस्थिती आहे.
माण तालुक्यातील एकूण ७२ पैकी ६७ शाळा २३ नोव्हेंबर रोजी सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये एकूण ११ हजार ४६७ विद्यार्थ्यांपैकी २ हजार २४० विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते. त्यानंतर काही गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे चार शाळा बंद करण्यात आल्या.
विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटून ती १ हजार ८६९ पर्यंत खाली आली. देवापूर शाळेत विद्यार्थिनीच कोरोनाबाधित सापडल्याने शाळा बंद करण्यात आली तर जांभुळणी, वरकुटे-मलवडी, पालवण, वडजल, राणंद, म्हसवड शहरातील मेरीमाता स्कूल, पिंगळी बुद्रुक, गोंदवले खुर्द व धुळदेव येथील शाळा गावांत कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे ग्रामस्थांनीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.