साताऱ्यात आता आयटी पार्कनंतर ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर मंजूर!, दरवर्षी तीन हजार युवक होणार प्रशिक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:46 IST2025-12-09T19:45:49+5:302025-12-09T19:46:10+5:30
टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे हे नवीन केंद्र लवकरच उभे राहणार

साताऱ्यात आता आयटी पार्कनंतर ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर मंजूर!, दरवर्षी तीन हजार युवक होणार प्रशिक्षित
सातारा : ‘सातारा जिल्ह्यासाठी ११५ कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर झाले आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून, टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे हे नवीन केंद्र लवकरच उभे राहणार आहे.
सातारा जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी दोघांचेही कौतुक केले आहे.
सातारा येथे होणाऱ्या या ‘सीट्रिपल आयटी’ केंद्राच्या एकूण ११५ कोटींच्या खर्चापैकी ९७ कोटी ७५ लाख रुपये टाटा कंपनीतर्फे तर, १७ कोटी २५ लाख रुपये राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहेत. साताऱ्यासाठी ‘सीट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करून आणल्यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख अत्याधुनिक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळण्याचा तसेच जिल्ह्यामध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ‘सीट्रिपल आयटी’ केंद्रामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांना ‘एआय’ वापरासह जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाची, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे.
उद्योग क्षेत्राला स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दिष्टांची पूर्तता या ‘सीट्रिपल आयटी’ केंद्रामुळे होणार आहे. नागेवाडी, सातारा येथे आयटी पार्क उभारणीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरू असून, त्याची काही दिवसांपूर्वी तीन हजार युवक दरवर्षी प्रशिक्षितची अधिसूचना काढण्यात आली होती. आता साताऱ्यासाठी नवीन सेंटर मंजूर झाल्याने जिल्ह्यातील युवकांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
उद्योगपूरक वातावरण होण्यास मदत
टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य शासन यासाठी निधी उपलब्ध करणार असून, या नव्या सेंटरमधून दरवर्षी तीन हजार युवकांना प्रशिक्षित केले जाईल, त्यातून जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.