Satara Politics: जिल्हा परिषद सिर्फ झांकी है, अभी ‘जिल्हा बँक’ तो बाकी है; भाजपचे पुढचे लक्ष्य सहकारी बँक, संस्था
By हणमंत पाटील | Updated: March 23, 2026 19:37 IST2026-03-23T19:37:06+5:302026-03-23T19:37:28+5:30
भाजपचे पुढचे लक्ष्य सहकारी बँक व संस्था

Satara Politics: जिल्हा परिषद सिर्फ झांकी है, अभी ‘जिल्हा बँक’ तो बाकी है; भाजपचे पुढचे लक्ष्य सहकारी बँक, संस्था
हणमंत पाटील
सातारा : जिल्ह्यातील राजकारणाचा व सहकाराचा ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ हा पाया मानला जातो. त्यामुळे जिल्हा बँकेतील सत्तेचा मार्ग जिल्हा परिषदेतीलराजकारणाच्या मार्गाने जातो. आता भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून जिल्हा बँक ताब्यात घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांची पुढची ‘रणनीती’ म्हणजे “जिल्हा परिषद तो सिर्फ झांकी है, जिल्हा बॅँक तो बाकी है” अशी राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जवळजवळ साडेसहा दशके म्हणजे २०२४ पर्यंत सातारा हा कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. तब्बल ६४ वर्षांच्या बालेकिल्ल्याला २०२४च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सुरूंग लागला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघाचे भक्कम बुरूज ढासळले.
भाजपच्या आमदारांनी आठपैकी चार विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे व प्रभाकर घार्गे यांचा पराभव केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील ताकद वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भोसले व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळात संधी दिली.
परिणामत: जिल्ह्यात भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला. जानेवारी २०२६मध्ये झालेल्या सातारासह ९ नगरपालिका व एक नगरपंचायतींची निवडणूक भाजपने ‘स्वबळा’वर लढविली. त्यामध्ये पाचगणी व महाबळेश्वरवगळता आठ नगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली. त्यानंतर ७ फेब्रुवारीला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पुन्हा ‘स्वबळा’चा नारा देत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेच्या नेत्यांना टार्गेट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीशी तडजोड करून ६५पैकी सत्तेसाठी बहुमतासाठी आवश्यक ३५ जागा मिळविल्या.
परंतु, भाजप विरूद्ध सर्व असे चित्र जिल्हा परिषद निवडणुकीत निर्माण झाल्याने भाजपला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले. तरीही भाजपने ऑपरेशन लोटसचा प्रयोग विरोधकांचे पाच सदस्य फोडून ३० विरूध्द ३३ मतांनी जिल्हा परिषदेत सत्ता आणली. त्यामुळे भाजपचे पुढेच लक्ष्य आगामी नऊ महिन्यांनंतर होणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुका असणार आहेत.
भाजपचा मोर्चा जिल्हा बँकेकडे
भाजपच्या नेत्यांनी ऑपरेशन लोटस राबवून जिल्हा परिषदेचे पाच सदस्य फोडले, तर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष व राजू भोसले उपाध्यक्ष झाले. आगामी नऊ महिन्यानंतर होणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुका हे भाजपचे पुढचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने सहकारी सोसायटी, संस्थांमध्ये आतापासून फिल्डिंग लावली जाण्याची शक्यता आहे.
‘यशवंत’ विचार पडला मागे
सातारा जिल्हा पुरोगामी व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ‘यशवंतनीती’च्या राजकारणातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सातारा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण व एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्त केले. मात्र, १९९९ साली काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यानंतर १९९९ ते २०१७ अशी दोन दशके सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला. मात्र, २०२४च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर या बालेकिल्ल्याचे एक एक बुरूज ढासळत गेले. अनेक वर्षे निर्विवाद वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषदेवर ‘ऑपरेशन लोटस’द्वारे भाजपने ताबा घेतला. अन् जिल्ह्यातील पुरोगामी व बेरजेच्या राजकारणाचा ‘यशवंत’ विचार मागे पडला.
पक्षविरहीत बँकेत आता राजकारण
राज्यातील एक आदर्श जिल्हा बँक म्हणून साताऱ्याची ओळख आहे. त्याचे कारण म्हणजे आजपर्यंतचा जिल्हा बँकेचा कारभार राजकीय पक्षविरहीत व ‘शेतकरी केंद्रित’ होता. त्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री मंकरंद पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार नितीन पाटील यांनी पक्षीय राजकारण जिल्हा बँकेत न आणता स्वतंत्रपणे बँकेचा कारभार होऊ दिला. मात्र, आता हे सर्व ‘यशवंत’ विचारांचे नेते भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शरदचंद्र पवार पक्ष अशा विविध विचारधारेच्या व धोरणाच्या पक्षात विभागले आहेत. त्यामुळे आता पक्षविरहीत बँकेत राजकारणाचा शिरकाव अपरिहार्य होणार असल्याचे चित्र दिसत आहे. ----------