Satara Rain: तुफान पावसामुळे सातारा जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू, ३५ जण बेपत्ता; नद्यांना मोठा पूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:14 IST2021-07-23T18:13:46+5:302021-07-23T18:14:15+5:30
Satara landslide, Rain update: पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळल्या, नद्यांना मोठा पूर. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Satara Rain: तुफान पावसामुळे सातारा जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू, ३५ जण बेपत्ता; नद्यांना मोठा पूर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे. सातारा, पाटण, वाई, जावली या तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून यामुळे ८ जणांचा मृत्यू आणि सुमारे ३५ जणांहून अधिक जण बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. (Satara flood, Rain update: 8 died and 35 missing.)
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्येही ५५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाट बंद असून पोलादपूरकडे जाणारा रस्ता २० फूट खाली खचला आहे. त्यामुळे पाहणीसाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा पाटील काही काळ अडकून पडल्या होत्या. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून कराड शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे.
वाई तालुक्यातील देवरुख याठिकाणी ५ घरांवर दरड कोसळली आहे. त्याठिकाणाहून आत्तापर्यंत २७ जणांना वाचविण्यात आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर याठिकाणीही मोठी दरड कोसळल्यामुळे त्याखाली १० ते १२ घरे गाडली गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणाहून ६० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र, १५ लोक बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. पाटण तालुक्यातीलच मिरगाव याठिकाणीही दरड कोसळल्यामुळे ७ ते ८ घरांचे नुकसान झाले आहे. तर याठिकाणी १२ लोक बेपत्ता आहेत. याठिकाणी एनडीआरएफची टीम पाठविण्यात आली आहे. मात्र, रस्ताच नसल्यामुळे ते देखील हतबल झाले आहेत. तरीही या लोकांना कोयना धरणातून बोटीच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी आणण्याचे काम सुरु आहे. ढोकावळे या पाटणमधीलच गावातील ४ जण बेपत्ता आहेत. तर उंबर्डी येथेही दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी जावली तालुक्यातील रेंगडी येथे वाहून गेलेल्या चार लोकांपैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. तर जोर येथील २ जण पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.