दोन वर्षात कृष्णा नदी स्वच्छ करू, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:34 IST2025-06-02T16:33:47+5:302025-06-02T16:34:23+5:30
कृष्णा नदी स्वच्छतेसाठी सांगलीत भव्य रॅली

दोन वर्षात कृष्णा नदी स्वच्छ करू, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
सांगली : भूतकाळातील चुका विसरून आपण एकत्र येत वर्तमान आणि भविष्य स्वच्छ बनवूया. दोन वर्षात कृष्णा नदी स्वच्छ करू व जिल्हा प्रशासन निर्धार फौंडेशनच्या कार्याला पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिले.
कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांच्या पुढाकाराने सांगली शहरात रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी स्वतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत रॅलीत सहभागी झाले.
‘जयतु कृष्णे’ या अभियानाची औपचारिक सुरुवात या रॅलीतून झाली. पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे नेते शेखर इनामदार म्हणाले, राकेशसारख्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवूनच आम्ही सांगलीकर खंबीरपणे त्याच्यासोबत आहोत.
राकेश दड्डणावर म्हणाले, मी एक कृष्णामाईचा पुत्र म्हणून २,६०० दिवस झाले स्वच्छतेची सेवा करतोय, आता यामध्ये हा लढा आणखी तीव्र करणे गरजेचे वाटत आहे. कृष्णा नदीसाठी चळवळ उभी राहावी या उद्देशाने आजची कृष्णा माई स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मकरंद देशपांडे, सुगंधा कुलकर्णी, अरुणा नवले, कविता मगदूम, सुशील हडदरे यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. रॅलीच्या शेवटी सर्वांनी नदी स्वच्छतेची शपथ घेतली.
जयतु कृष्णे अभियानाला सुरुवात
कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी आम्ही उगमापासून संगमापर्यंत प्रयत्नशील राहणार आहे. नमामि गंगे प्रमाणेच कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी जयतु कृष्ण या अभियानाची सुरुवात करीत आहोत. या अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यापासून म्हैसाळ पर्यंत कृष्णा नदी स्वच्छतेसाठी सांगलीत भव्य रॅली मार्फत नदीकाठच्या गावात शहरात जाऊन दर रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे यावेळी राकेश दड्डणावर यांनी सांगितले.
रॅलीस शेकडो लोकांचा प्रतिसाद
सकाळी मारुती चौकातून सुरू झालेली रॅली सरकारी घाटापर्यंत फलक, घोषवाक्ये आणि स्वच्छतेचा संदेश देत पुढे सरकली. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला.
अधिकाऱ्यांची अनुपस्थिती
या महत्त्वाच्या उपक्रमात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हा प्रशासन या कामी अग्रेसर राहील, असे आश्वासन दिले. मात्र रॅलीमध्ये सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती दिसून आली.