मिरज-पंढरपूर मार्गावर प्रवासी भारमानाअभावी नव्या गाड्यांची प्रतिक्षाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:05 IST2026-03-27T13:04:44+5:302026-03-27T13:05:08+5:30
सांगली : मिरज - पंढरपूर लोहमार्गावर छोट्या स्थानकात प्रवासी बुकिंग वाढविण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. सध्या मोजक्याच गाड्या या ...

मिरज-पंढरपूर मार्गावर प्रवासी भारमानाअभावी नव्या गाड्यांची प्रतिक्षाच
सांगली : मिरज - पंढरपूर लोहमार्गावर छोट्या स्थानकात प्रवासी बुकिंग वाढविण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. सध्या मोजक्याच गाड्या या मार्गावर धावत आहेत. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त असल्याने गाड्यांची संख्या वाढण्यात अडचणी येत आहेत.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने थांबे रद्द केलेले नाहीत, मात्र तेथील स्थानकाची इमारत व कर्मचारी वर्ग काढून घेतला आहे. बेळंकीसह काही स्थानकांवर सध्या गाड्यांचे थांबे कायम आहेत. मात्र तेथे कर्मचारीवर्ग नाही. तिकिटांच्या विक्रीसाठी कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. मिरज-पंढरपूरसह मिरज पुणे मार्गावरही प्रवासी भारमान वाढविण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न आहेत. प्रवाशांची संख्या वाढली नाही, तर नव्या गाड्या सुरु होण्यात अडचणी येऊ शकतात.
सध्या मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता त्यावरुन नवनव्या गाड्या सुरु होण्याची अपेक्षा आहे. विशेषत: दक्षिण भारताकडे व उत्तरेकडे धावणाऱ्या गाड्या वाढल्यास त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. सध्या कोल्हापूर-मिरज ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या हाऊसफुल्ल असतात. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
मिरज ते पंढरपूर मार्गावर नेमके उलट चित्र आहे. प्रवासी संख्या वाढत नसल्याचे कारण देत नवीन गाड्या सुरु करण्यास प्रशासन असमर्थता दर्शवत आहे. कोल्हापूर - गुलबर्गा ही एक्सप्रेस सकाळच्या टप्प्यात सुरु झाल्यास उत्पन्न वाढणार आहे, मात्र तसा निर्णय रेल्वेने अद्याप घेतलेला नाही.