सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ शुक्रवारीही कायम राहिली. गुरुवारपेक्षा रुग्णसंख्येत वाढ होताना ३२ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्येत वाढच होत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेल्या चार दिवसांपासून २५ पेक्षा जादा रुग्णांची नोंद होत आहे. दाखल रुग्णसंख्याही वाढत आहे. शुक्रवारी महापालिका क्षेत्रात सांगलीत १६, तर मिरजेत २ रुग्ण आढळले. जिल्ह्यात सर्वाधिक ६ रुग्ण वाळवा तालुक्यात आढळले आहेत.
प्रशासनाने आरटीपीसीआरअंतर्गत केलेल्या ५२१ जणांच्या तपासणीतून २३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ७१९ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ११ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येने सव्वादोनशेची संख्या गाठली आहे. उपचार घेणाऱ्या २२५ रुग्णांपैकी ४५ जणांची प्रकृती चिंताजनक असून ३८ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.