Sangli: आरफळ कालव्यामध्ये पडून सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:04 IST2026-01-17T19:03:54+5:302026-01-17T19:04:20+5:30
सहा कि.मी.वर सापडला मृतदेह

Sangli: आरफळ कालव्यामध्ये पडून सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू
विटा (जि. सांगली) : आळसंद (ता.खानापूर) येथे इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा वर्षाच्या बालकाचा आरफळ कालव्याच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. राजवीर सोमनाथ जाधव (वय ६, रा. आळसंद) असे दुर्दैवी अंत झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्यचाया सुमारास घडली. दरम्यान, शोधमोहिमेनंतर सहा कि. मी. अंतरावर आरफळच्या कालव्यात राजवीर याचा मृतदेह सापडला.
आळसंद येथील राजवीर जाधव हा सहा वर्षाचा मुलगा विटा ते कुंडल रस्त्यावरील आरफळ कालव्यावरील रस्त्याने निघाला होता. त्यावेळी तो कालव्याच्या पुलावरून आरफळचे पाणी पहात असताना त्याचा तोल गेल्याने तो वाहत्या पाण्यात पडला. कालव्यातील वाहत्या पाण्याला वेग असल्याने काही क्षणातच तो दिसेनासा झाला.
त्यावेळी ही घटना काही महिलांनी पाहिली. महिलांनी आरडाओरड केली. परंतु, त्या ठिकाणी कोणीही पुरूष नसल्याने राजवीर याला वाचविता आले नाही. मात्र, या घटनेची माहिती गावातील स्थानिक ग्रामस्थांना समजताच सर्वांनी आरफळ कालव्यावर गर्दी केली. त्यातील काही जणांनी पाण्यात उड्या घेऊन राजवीर याची शोधमोहीम सुरू केली.
परंतु, उशिरापर्यंत राजवीर याचा शोध लागला नाही. त्यानंतर तब्बल ६ कि. मी. अंतरावर राजवीर याचा मृतदेह ग्रामस्थांना पाण्यात दिसला. या घटनेने राजवीर याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजवीर हा जिल्हा परिषद शाळेतील इ. पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो अत्यंत गुणी, होतकरू व हुशार आणि शाळेचा लाडका विद्यार्थी होता. त्याच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
आरफळमध्ये ७ जणांनी गमावला जीव...
आळसंद गावापासून गेलेल्या आरफळ कालव्यात गेल्या काही वर्षापासून अशा अनेक घटना घडत आहेत. या ठिकाणी तीन ते चार लहान मुले, दोन महिला व एक पुरूष अशा ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आळसंद गावाशेजारून गेलेल्या आरफळ कालव्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.