Sangli: सर्व्हर डाऊनमुळे सेतू कार्यालयाचे कामकाज ठप्प; विद्यार्थी, पालकांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:31 IST2025-06-09T14:31:14+5:302025-06-09T14:31:35+5:30
पंधरा दिवस फेऱ्या मारून नागरिकांना दाखले मिळेनात

Sangli: सर्व्हर डाऊनमुळे सेतू कार्यालयाचे कामकाज ठप्प; विद्यार्थी, पालकांचे हाल
सांगली : सेतू कार्यालयातील ऑनलाइन सेवा काही तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली आहे. ज्यामुळे अनेक शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. महा-आयटी विभागाकडून (महा-आयटी विभाग) सॉफ्टवेअर अपग्रेडचे काम सुरू आहे. ज्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक आपल्या कामांसाठी सेतू कार्यालयात जात आहेत. परंतु त्यांना ऑनलाइन सेवा मिळत नसल्यामुळे तासनतास वाट पाहावी लागत आहे.
राज्य सरकारच्या महा-आयटी विभागामार्फत सेतू, महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून शासकीय जात पडताळणी दाखले प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. गेल्या आठ दिवसांपासून महा ऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्व केंद्रांवरील कामकाज तांत्रिक कारणास्तव ठप्प झाले. त्यामुळे इतर कामकाजासाठीदेखील या केंद्रांवर रांगा लावल्याचे दिसून येत आहेत.
अनेक केंद्रांत बिघाड असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. ज्यांनी अगोदरच दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज केला आहे, ते दाखलेही स्वाक्षरीविना प्रलंबित आहेत. सर्व्हर डाऊन असल्यामुळे अधिकाऱ्यांना लॉगइन करता येत नाही. त्यामुळे दाखलाच ओपन होत नसल्याने थंब देणार तरी कसा, असा सवाल अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
आठ दिवसांपासून तक्रारी
महा-आयटीच्या एकाच सर्व्हरमध्ये राज्यातील सर्व संकलित माहिती (डाटा) साठविण्यात येतो. मात्र, यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने सर्व्हर बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांची कामे थांबली आहेत. राज्य सरकारच्या महा-आयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून या सेवा केंद्रांच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत आहेत.
विद्यार्थी, पालकांचे हाल
दाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षांचे अर्ज आणि इतर शैक्षणिक प्रक्रियांना सामोरे जाताना अडथळे येत आहेत. विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी सेतू कार्यालयात सध्या प्रचंड गर्दी दिसत आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे कामकाज ठप्प झाले आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘आमच्या मुलांचे भविष्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे अंधारले आहे,’ अशा प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.