माझी वसुंधरा अभियानात सांगली जिल्हा परिषद सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम, विशाल नरवाडे सर्वोत्कृष्ट सीईओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:11 IST2026-02-18T19:11:19+5:302026-02-18T19:11:50+5:30
शनिवारी मुंबईत सत्कार

माझी वसुंधरा अभियानात सांगली जिल्हा परिषद सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम, विशाल नरवाडे सर्वोत्कृष्ट सीईओ
सांगली : माझी वसुंधरा अभियानामध्ये सांगलीजिल्हा परिषदेला सलग तिसऱ्या वेळी राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी तासगाव पंचायत समितीने राज्यात अव्वल येत झेंडा फडकविला आहे. मिरज पंचायत समिती द्वितीय, तर कवठेमहांकाळ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अभियानाचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर झाला. विभागस्तरावर खानापूर-विटा, पलूस व कडेगाव आणि जिल्हा परिषद स्तरावर कडेगाव पंचायत समितीने बाजी मारली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी राज्यात ‘सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून प्रथम क्रमांक पटकविला आहे. १३ ग्रामपंचायतींनी विविध गटांत यश मिळवत सुमारे १० कोटी ७५ लाखांची बक्षिसे पटकावली आहेत.
१ हजार लोकसंख्या गटात पिंपळवाडी राज्यात द्वितीय क्रमांकावर आली आहे. १ ते दीड हजार लोकसंख्येत अलकूड (एम) विभागात द्वितीय, २ ते ३ हजार लोकसंख्येत नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) राज्यात प्रथम, तर लंगरपेठ तृतीय क्रमांकावर आहे. ३ ते ५ हजार लोकसंख्येत आळसंद (ता. खानापूर) राज्यात प्रथम, तर वाळेखिंडीने (ता. जत) तृतीय क्रमांक मिळविला. धुळगावने (ता. कवठेमहांकाळ) विभागस्तरावर दुसरा क्रमांक मिळविला.
५ ते १० हजार लोकसंख्येत येडेनिपाणी (ता. वाळवा) राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. याच ग्रामपंचायतीने भूमी थिमेटिक प्रकारात राज्यात पहिला, तर सलगरेने (ता. मिरज) ग्रामपंचायतीने विभागात दुसरा क्रमांक पटकविला आहे. १० हजारांहून अधिक लोकसंख्येत बोरगावने (ता. वाळवा) राज्यात द्वितीय, कासेगावने तृतीय क्रमांक मिळविला. पुणे विभागात पेठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात आले.
शनिवारी मुंबईत सत्कार
राज्यपातळीवर उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींचा, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार मुंबईत शनिवार (दि.२१) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
अभियानात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रभावी नियोजन आणि पर्यावरणाशी बांधिलकी, यामुळे सांगली जिल्हा परिषद सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविण्यात यशस्वी ठरली. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायतींचे महत्त्वाचे योगदान आहे. -शशिकांत शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी