सावधान..! दर १७ तासाला जातोय एकाचा अपघाती बळी; रस्ता सुरक्षा अभियानाची कायमस्वरूपी गरज
By घनशाम नवाथे | Updated: February 14, 2026 18:27 IST2026-02-14T18:26:36+5:302026-02-14T18:27:07+5:30
प्राणांतिक अपघाताचे प्रमाण वाढले

संग्रहित छाया
घनश्याम नवाथे
सांगली : रस्ता सुरक्षा अभियानाचा नुकताच समारोप झाला; परंतु अपघाताचे पुढे काय ? असा प्रश्न कायम आहे. कारण गतवर्षात तब्बल ५११ प्राणांतिक अपघात झाले आहेत. दर १७ तासाला एकाचा अपघाती बळी जातोय. ही अपघाती बळींची मालिका सुरक्षा अभियानाच्या काळातही सुरूच होती. त्यामुळे अभियान महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत वेगवेगळ्या मार्गांवर जवळपास ६५ अपघातस्थळे अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ होते. या ठिकाणी वारंवार अपघात होत होते. तेथील फलकांवरील अपघातप्रवण क्षेत्र म्हणून असलेला उल्लेख चालकांना सावधान करत होता; परंतु गेल्या काही वर्षांत हे ‘ब्लॅक स्पॉट’ नामशेष करण्यात आले. ‘ब्लॅक स्पॉट’ नामशेष केल्यानंतर अपघातांची संख्या कमी होईल अशी शक्यता होती; परंतु अपघातसंख्या कमी न होता प्रत्येक वर्षी वाढतच चालली आहे.
अपघाताला कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, खराब रस्ते, अरुंद पूल आदी कारणांमुळे होणाऱ्या अपघातांपेक्षा चालकाच्या बेदरकारपणामुळे होणारे अपघात वाढत आहेत. मानवी चुकांमुळे अधिक अपघात होत असल्याचे अलीकडच्या काळात दिसून येत आहे. दारूच्या नशेत वाहन चालवणे, वेगाची मर्यादा ओलांडणे, नादुरुस्त वाहने चालवणे, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.
त्यामुळेच रस्ता सुरक्षा अभियान केवळ महिन्यापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी राबवण्याची गरज आहे. अभियानात काही शाळांमध्ये वाहतूक नियमांचे धडे शिकवण्यात आले. हा चांगला उपक्रम म्हणावा लागेल. कारण बालवयातच नियमांचे धडे गिरवले तर भविष्यात ‘ट्रॅफिक सेन्स’ असलेले नागरिक घडतील.
अपघातांचे प्रमाण वाढले
जिल्ह्यात २०२४ मधील प्राणांतिक अपघाताचे प्रमाण पाहिले तर दर २० तासाला एक अपघाती बळी जात होता; परंतु २०२५ मध्ये हेच प्रमाण १७ तासांवर आले आहे. जिल्ह्यात १७ तासाला एकाचा अपघाती बळी जातोय. हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे.
अपघाती जखमींची संख्याही अधिक
प्राणांतिक अपघातामध्ये बळी जाणाऱ्यांच्या संख्येपेक्षा गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. अपघातामध्ये अपंगत्व आल्यामुळे आयुष्यभर अनेकांना अंथरुणाला खिळून राहावे लागते. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व घेऊन जगावे लागते.
अपघाताची प्रमुख कारणे
बेदरकारपणे वाहन चालवून वेगाची मर्यादा ओलांडणे, नशेत वाहन चालवणे, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, नादुरुस्त वाहन चालवणे, लेन शिस्तीचे पालन न करणे यासह वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात होतात. त्याचबरोबर काहीवेळा खराब रस्त्यांमुळेही अपघात होतात.
दररोज ५०० हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखा, पोलिस ठाणे यांच्यामार्फत कारवाई होते. सीसीटीव्हीवरूनही ई-चालान पाठवले जाते. दररोज ५०० हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई होते. आरटीओ कार्यालयामार्फतही रोज कारवाई होत असते. ‘ट्रॅफिक सेन्स’ नसल्याचे यावरून दिसून येते. हे चित्र बदलण्यासाठी कायमस्वरूपी जागृती हवी.
प्राणांतिक अपघातांची संख्या
वर्ष - अपघात
२०२३ - ३४९
२०२४ - ४३३
२०२५ - ५११