कोल्हापूर-मुंबई मार्गावर २४ सप्टेंबरपासून जादा रेल्वे धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:41 IST2025-09-08T17:40:45+5:302025-09-08T17:41:13+5:30
दादर - म्हैसूर २० मिनिटे अगोदर सुटणार

कोल्हापूर-मुंबई मार्गावर २४ सप्टेंबरपासून जादा रेल्वे धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार.. जाणून घ्या
सांगली : कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर ही साप्ताहिक विशेष एक्सप्रेस रेल्वे २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. या काळात तिच्या जाता-येता २० फेऱ्या होतील.
गाडी क्रमांक ०१४१८ ही कोल्हापूर - मुंबई साप्ताहिक विशेष गाडी दर बुधवारी कोल्हापुरातून रात्री १० वाजता निघेल. सांगलीरेल्वे स्थानकात रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी येईल. दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४१७ ही मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कोल्हापूर साप्ताहिक विशेष गाडी दर गुरुवारी दुपारी २:३० वाजता निघेल. सांगलीत रात्री १ वाजता पोहोचेल. कोल्हापुरात पहाटे ४:२० वाजता जाईल.
या एक्सप्रेसला मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण हे थांबे आहेत. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, १० स्लीपर, ४ सामान्य, २ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी या गाडीसाठी पाठपुरावा केला होता.
दादर - म्हैसूर २० मिनिटे अगोदर सुटणार
दादर - म्हैसूर- तिरूनेलवल्ली- पुद्दुचेरी ही गाडी मिरज जंक्शनमधून सकाळी ६:५० ऐवजी सकाळी ६:३० वाजता सुटेल. अजमेर - बंगळुरू, जोधपूर - बंगळुरू, गांधीधाम - बंगळुरू ही एक्सप्रेस मिरजमधून सकाळी ७:४५ ऐवजी सकाळी ७:२५ वाजता सुटेल. शनिवारपासून (दि. १३) हा बदल अमलात येणार आहे. रेल्वेच्या वेळापत्रकातील बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे, सुकुमार पाटील यांनी केले आहे.