तासगावात माजी खासदारपुत्राची माघार; सांगली जिल्हा परिषदेसाठी २११, तर पंचायत समितीसाठी ३४० उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:36 IST2026-01-28T16:36:18+5:302026-01-28T16:36:46+5:30
जिल्हा परिषदेच्या मैदानातून ३७४, तर पंचायत समितीच्या रिंगणातून ७१० उमेदवारांची माघार

तासगावात माजी खासदारपुत्राची माघार; सांगली जिल्हा परिषदेसाठी २११, तर पंचायत समितीसाठी ३४० उमेदवार रिंगणात
सांगली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या रिंगणातून ३७४ जणांनी, तर पंचायत समितीच्या मैदानातून ७१० जणांनी माघार घेतली. जिल्हा परिषदेच्या ६१ जांगासाठी २११ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी १२२ जागांसाठी ३४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघारीनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार), भाजप विरुद्ध काँग्रेस, तर भाजप विरुद्ध शिंदेसेना, अशा लढती, तर कुठे दोन राष्ट्रवादी एकत्र येत काँग्रेसविरुद्ध, भाजपविरुद्ध लढत असल्याचे चित्र आहे.
उमेदवारीचे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी अर्ज माघार घ्यावी यासाठी तमाम प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मनधरणी केली. या प्रयत्नांना बहुतांशी ठिकाणी यश आले, तर काही ठिकाणी अपयश आले आहे. जिथे अपयश आले तिथे चौरंगी किंवा बहुरंगी लढती होणार हे स्पष्ट झाले आहे. सोयीने महायुती व सोयीने महाआघाडीचे चित्र सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणी स्वबळावर काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षासोबत लढत आहेत, तर काही ठिकाणी मित्रपक्ष शिंदेसेनेविरुद्धही भाजप लढत आहे. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र आघाडीही काही ठिकाणी दिसते.
कडेगाव, पलूस या तालुक्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात दुरंगी लढत होत आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काही ठिकाणी भाजप, तर काही ठिकाणी काँग्रेसविरुद्ध लढत आहे. खानापूर तालुक्यात भाजप हा मित्रपक्ष शिंदेसेनेसोबत थेट दुरंगी लढत देत आहे. शिराळा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजप आणि जनसुराज्य पक्षाशी लढत आहेत. मिरज तालुक्यात महाविकास आघाडीत काँग्रेससोबत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपशी लढत देत आहेत. बहुतांशी ठिकाणी प्रमुख पक्षांना बंडखोरी थोपविण्यात यश आले आहे.
तासगावात माजी खासदारपुत्राची माघार
तासगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चिंचणी गटातून माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनी माघार घेत आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या होम पिचवरून माघार घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगत आहे. चिंचणी गटातून राष्ट्रवादी (शरद पवार)कडून संजय पाटील यांचे पुतणे अक्षय पाटील लढत आहेत.