सांगली : येथील विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी बुधवार दि. ४ जून रोजी दुपारी ४ वाजता बैठक बोलवली आहे. ही बैठक कळंबी (ता. मिरज) येथे होणार आहे. या बैठकीस मदनभाऊ पाटील समर्थक कार्यकर्त्यांना बोलवले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस की भाजपमध्ये जावे, याचा फैसला होणार आहे. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये थांबण्याची विनंती जयश्रीताई यांच्याकडे केली आहे.सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद सोडविण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाही अपयश आले होते. यातूनच काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात बंडखोरी झाली. जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यामुळे सांगलीची जागा काँग्रेसने हातची गमावली अशी मतदारसंघात चर्चा रंगली होती. निवडणुकीच्या दरम्यानच काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करून सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. यामुळेच जयश्रीताई पाटील या काँग्रेसपासून दूर होत्या.येत्या चार महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काही तरी भूमिका स्पष्ट करा, अशी मदनभाऊ समर्थकांनी जयश्रीताई यांच्याकडे मागणी केली होती. काही समर्थकांनी काँग्रेसमध्ये थांबून निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली. काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपणास पाठबळ देतील, असे म्हटले आहे.मोजक्याच कार्यकर्त्यांनी जयश्रीताई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास गट वाढीसाठी पाठबळ मिळेल, असे सुचविले आहे. कार्यकर्त्यांच्या या सर्व भूमिकेवर चर्चा करण्यासाठी जयश्रीताई पाटील यांनी कळंबी येथे बुधवारी बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये जयश्रीताई यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही तरी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. म्हणूनच, कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी मदनभाऊ प्रेमी सर्वच कार्यकर्त्यांची कळंबी (ता. मिरज) येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील भूमिका घेणार आहे. - जयश्रीताई पाटील, उपाध्यक्षा, जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली.