सांगली जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट मिळणार एबी फॉर्म; बंडखोरी टाळण्यासाठी पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:35 IST2026-01-21T14:35:14+5:302026-01-21T14:35:52+5:30
फोनवरुन निरोप

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट मिळणार एबी फॉर्म; बंडखोरी टाळण्यासाठी पाऊल
सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे, तरीही उमेदवारी निश्चितीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांचे गुऱ्हाळ सुरुच आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांना थेट बुधवारी सकाळी एबी फॉर्म दिला जाणार आहे. उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत खल सुरु राहिला.
निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी अंतिम मुदत असताना, सर्वच प्रमुख पक्षांनी अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी थंडा करके खाओ ’ अशी भूमिका घेतली आहे. डावपेच ऐनवेळी उघड करण्याची रणनीती आखली जात आहे. उमेदवारीबाबतची अनिश्चितता वाढत चालल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे.
महायुतीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख यांच्यासह सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांच्या बैठका सुरू आहेत. युतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेसोबत युतीच्या वाटाघाटी सुरु होत्या.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय पाटील हे नेते उमेदवार निश्चित करण्यासह जागावाटपाबाबत चर्चा करत होते. रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरुच होते, मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना उमेदवार निश्चित करताना डोकेदुखीचा सामना करावा लागला.
बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्याचा धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले. महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे बुधवारी सकाळी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे.
फोनवरुन निरोप
सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. उमेदवारी जाहीर होताच बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ती रोखण्यासाठी पक्षांनी थेट उमेदवारी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांना थेट फेानवरुन पक्षाकडून निरोप देण्यात आला आहे.