चिपळूण : पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलवर गुरुवारी सायंकाळी पांढरा तवंग आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाणे खडपोली एमआयडीसीतील एखाद्या कंपनीने त्यांचे सांडपाणी या अवजलमध्ये सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र हे पाणी नक्की कोणत्या कंपनीने सोडले, हे सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.सोशल मीडियावर याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हे पाणी नक्की कोणी सोडले याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. काहींनी पिंपळी येथे दूरध्वनी करून माहिती घेतली. पिंपळी येथे गुरुवारी सायंकाळी पाण्यावर पांढरा तवंग आल्यानंतर चिपळूण नगर परिषदेच्या पाणी विभागानेही खबरदारीच्या उपायोजना सुरू केल्या.वीज निर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे अवजल वाशिष्ठी नदीला मिळते. चिपळूणमध्ये हे पाणी नगर परिषद उचलते आणि नागरिकांना पिण्यासाठी देते. गुरुवारी सायंकाळी आठ वाजता नगर परिषद पाणी उचलणार होते. तत्पूर्वी ही घटना समजल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नगर परिषदेने ते न उचलण्याचा निर्णय घेतला.शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या टाक्यांमध्ये पुरेसे पाणी आहे. ते नागरिकांना दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना भीतीचे कारण नाही. मात्र हा प्रकार मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. याबाबत माहिती देताना नगर परिषदेच्या पाणी विभागाचे प्रमुख रोहित खाडे म्हणाले की, आम्ही हे दूषित पाणी उचलणार नाही. यापूर्वी असा प्रकार घडला होता. त्यानंतर आम्ही सर्व प्रकारच्या खबरदारी घेत आहोत. वाशिष्टीचे पाणी उचलण्यापूर्वी आम्ही जॅकवेलच्या ठिकाणचे फोटो कर्मचाऱ्यांकडून मागवतो. त्यानंतरच पाणी उचलतो.आधीही घडला होता असाच प्रकारयापूर्वी असा प्रकार घडला होता तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलिसांशी पत्रव्यवहार करून अशाप्रकारे पाणी सोडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना केली होती. कारखानदारांशीही पत्रव्यवहार केला होता. आजचा प्रकार गंभीर आहे. आम्ही आमच्या स्तरावर उपयोजना करत आहोत. हे पाणी अरबी समुद्राला वाहून गेल्यानंतरच वाशिष्टीचे पाणी उचलले जाईल. असे खाडे यांनी सांगितले.
Ratnagiri: कोयना अवजलच्या पाण्यावर पांढरा तवंग, कोणत्या कंपनीचे सांडपाणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:13 IST