US-Israel-Iran war: मुंबईत पाय ठेवला अन् जिवात जीव आला, कोंडगावच्या बापू शेट्ये यांनी केल्या भावना व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:16 IST2026-03-07T16:15:59+5:302026-03-07T16:16:24+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील १३ जण सुखरूप परतले

US-Israel-Iran war: मुंबईत पाय ठेवला अन् जिवात जीव आला, कोंडगावच्या बापू शेट्ये यांनी केल्या भावना व्यक्त
रत्नागिरी : आमचा ११ जणांचा ग्रुप दुबई टूरसाठी गेला होता. परतीसाठी दुबई विमानतळावर आलो. पण विमानात बसल्यानंतर आम्हां खाली उतरविण्यात आले. आम्ही कधी परतणार, याविषयी साशंकता होती. अखेर सात दिवसांनंतर जेव्हा आम्ही दुबई सोडली आणि मुंबई विमानतळावर पाऊल टाकले, त्याचक्षणी आपण सुरक्षित पोहोचल्याच्या भावनेने जीवात जीव आला, अशा शब्दात दुबईतून गुरुवारी सपत्निक परतलेले कोंडगावचे माजी सरपंच संदेश तथा बापू शेट्ये यांनी भावना व्यक्त केल्या.
इस्रायल आणि इराक यांच्यात युद्ध सुरू झाल्याने दुबईत अडकलेल्या भारतीयांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १३ जणांची जिल्हा प्रशासनाकडे नोंद होती. यात गुहागरमधील नसीम इस्साक साल्हे, दापोलीतील सरपंच अक्षय श्रीधर फाटक, श्रीया अक्षय फाटक आणि शुभदा मोहन साठे हे तिघेजण, तर संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील पत्रकार सुरेश सप्रे, त्यांची पत्नी ज्योती सप्रे, जितेंद्र चंद्रकांत निमकर, रुचिता चंद्रकांत निमकर, अभिषेक जितेंद्र निमकर, मानसी जितेंद्र निमकर आणि श्रद्धा इंदूलकर, तर साखरपा कोंडगावचे माजी सरपंच, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश तथा बापू शेट्ये आणि त्यांची पत्नी सोनम शेट्ये अशा ११ जणांचा समावेश होता. हे सर्वही सुखरूप घरी परतले आहेत.
मुंबईच्या विमानतळावर बापू शेट्ये आणि सोनम शेट्ये हे दाम्पत्य गुरुवारी पहाटे उतरले. हा प्रवास कथन करताना बापू शेट्ये म्हणाले, आमचा ११ जणांचा ग्रुप दुबई टूरसाठी गेला होता. शेवटच्या दिवशी आम्ही दुबई विमानतळावर आलो. विमानात बसलो. मात्र, थोड्याच वेळात आम्हाला खाली उतरविण्यात आले. आम्ही इथून कधी निघणार, काहीच माहीत नव्हते. याचवेळी साखरप्यातील उदय बागवे यांनी दुबईस्थित माहेरवाशीण असलेल्या शिल्पा शिंदे-राणे यांच्याशी संपर्क केला.
राणे दाम्पत्य दोघही तिथे नाेकरी करतात. बागवे यांचा फोन झाल्यानंतर शिल्पा स्वत: कार घेऊन आम्हाला न्यायला आली. तिथे आम्ही पाच दिवस होतो. अखेर आमचे विमान निश्चित झाले. आम्ही पुन्हा विमानतळावर आलाे. पण पुन्हा विमान रद्द झाले. त्यामुळे राणे दाम्पत्याने पुन्हा मनाचा मोठेपणा दाखवल्याने दोन दिवसांचा मुक्काम पुन्हा त्यांच्याकडेच झाला. आमच्याकडचे पैसही संपले होते. मात्र, परतीच्या विमानाचा आम्हा दोघांचा तिकीट खर्च प्रति ८० हजार रुपयांप्रमाणे शिल्पा हिनेच केल्याची माहिती बापू शेटये यांनी दिली.
अखेर गुरुवारी पहाटे दुबईतून विमान मुंबईकडे झेपावले. पहाटे साडेपाच वाजता मुंबईत पाऊल ठेवल्यावर जीव भांड्यात पडला, असे शेट्ये यांनी सांंगितले.