Ratnagiri: पोहताना लाटेत वाहत गेले, आरे-वारे समुद्रात दोघे बुडाले; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:12 IST2026-03-30T12:11:30+5:302026-03-30T12:12:11+5:30
पालघर येथील कुटुंबाच्या आनंदावर विरजण, एकाला वाचविण्यात यश

संग्रहित छाया
रत्नागिरी : समुद्रात पाेहत असताना लाटेमध्ये वाहत जाऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे येथे घडली. संताेष शशिकांत भानुशाली (वय ५०, रा.नाईक काॅम्प्लेक्स भाजी मार्केट वाडा, ता. वाडा, जि.पालघर) असे मृताचे नाव आहे, तर याेग राजेश भानुशाली याला वाचवण्यात आले.
याबाबत पूर्णा संताेष भानुशाली (वय २२) यांनी रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, त्यांचे वडील संताेष भानुशाली आणि कुटुंब रविवारी फिरण्यासाठी रत्नागिरी येथे आले हाेते. हे सर्वजण सकाळी ९:३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गावरील आरे-वारे समुद्रकिनारी गेले हाेते. त्या ठिकाणी थाेडा वेळ फिरून त्यांनी फाेटाेही काढले. त्यानंतर, सर्व जण समुद्राच्या पाण्यात पाेहण्यासाठी गेले हाेते. पाण्यात पाेहत असताना संताेष भानुशाली, तसेच मानव, याेग व वरद असे पाण्यात पुढे पुढे पाेहण्यासाठी जात हाेते.
त्याच वेळी समुद्राची माेठी लाट आली आणि चाैघेही लाटेमध्ये मागे पुढे हाेऊ लागले. यातून मानव आणि वरद हे समुद्राच्या पाण्यातून तत्काळ बाहेर आले. मात्र, संताेष भानुशाली आणि याेग राजेश भानुशाली हे समुद्राच्या लाटेबराेबर वाहत गेले. समुद्राच्या पाण्यात ओढले जाताच त्या ठिकाणी रेस्क्यू करणाऱ्या व्यक्तींनी धाव घेतली. त्यांनी दाेघांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी याेग भानुशाली हा शुद्धीवर हाेता, तर संताेष भानुशाली हे बेशुद्धावस्थेत हाेते.
त्यांना खासगी वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संताेष भानुशाली यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, तर याेग भानुशाली याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा २०२३ चे कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पाेलिस करत आहेत.
पीसीआर दिला पण...
संताेष भानुशाली यांना पाण्याबाहेर काढले असता ते बेशुद्ध पडलेले हाेते. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना पीसीआर दिला. त्यावेळी त्यांचा साधारण श्वास सुरू असल्याचे दिसले. त्यानंतर, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना वाचविण्यात यश आले नाही.