रत्नागिरी: राजापुरातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला, शेतीचे मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 13:19 IST2022-07-05T13:10:08+5:302022-07-05T13:19:36+5:30
संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत असतानाच कालवा फुटल्याची मोठी दुर्घटना घडली.

रत्नागिरी: राजापुरातील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला, शेतीचे मोठं नुकसान
रत्नागिरी : जिल्ह्यात काल, सोमवार पासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. जगबुडी आणि काजळी या दोन मोठ्या नद्यांनी काल सोमवारीच इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान, हवामान खात्याने कोकणात पुढील चार दिवस ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत असतानाच एक मोठी दुर्घटना घडली. पाचल कोडंवाडी (पवार वाडी) येथे अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला.
दोन दिवसापासून पाऊस चांगलाच कोसळू लागला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, ओढे-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. घाट मार्गावर दरडी कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच पाचल कोडंवाडी (पवार वाडी) येथे अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला. यामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. गोविंद राजाराम पवार, विकास सदानंद पवार, गोपाळ सिताराम पवार या शेतकऱ्यांची भात शेती वाहून गेली.