रस्त्यावर सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:33+5:302021-04-24T04:31:33+5:30

गुहागर : लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, दूध, भाजी आदींसाठी विक्री सुरू आहे. मात्र, ...

Samsum on the street | रस्त्यावर सामसूम

रस्त्यावर सामसूम

गुहागर : लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, दूध, भाजी आदींसाठी विक्री सुरू आहे. मात्र, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच सेवेसाठी मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरात ही सर्व दुकाने ११ वाजता बंद झाल्यानंतर रस्त्यांवर सामसूम पसरलेली असते. ठरावीक वाहनेच सुरू असतात.

डोर्लेत काजू लागवड

रत्नागिरी : जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जलद गतीने राबविण्यात येत होती. तालुक्यातील डोर्ले गावातही या योजनेचा लाभ घेऊन ७.२९ हेक्टर क्षेत्रावर आंबा काजू लागवड यशस्वी राबविण्यात आली असून, मजुरीपोटी दोन लाख रुपयांचे वितरण झाले आहे.

निराधार महिलांना वाटप

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्येचे उपसरपंच, तसेच काँग्रेस जिल्हा युवा उपाध्यक्ष संजू लोटणकर यांनी गरजू महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे मानधनाचे वाटप केले. राज्य शासनाकडून उपसरपंचांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम लोटणकर यांनी या महिलांना दिली आहे. लाभार्थींनी लोटणकर यांना धन्यवाद दिले.

आंजर्लेत लसीकरण केंद्र

दापोली : दापोली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत येथील दौऱ्यावर आले असता त्यांनी आंजर्ले येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता हे लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मुंबईकरांचा धसका

लांजा : शिमगोत्सवात गावाला आलेल्या मुंबईकरांमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे स्पॉट असल्याने पुन्हा मुुंबईकर चाकरमानी गावाला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच पुन्हा मुंबईकर गावी आले तर या भीतीने तालुकावासीय धास्तावले आहेत.

कामगारांवर संकट

राजापूर : सध्या शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत सार्वजनिक बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य बांधकामे बंद आहेत. या बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हातचे काम थांबल्याने पुन्हा या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

कमाल तापमानात वाढ

रत्नागिरी : सध्या मळभी वातावरण कमी झाले असले तरी येत्या तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता पुन्हा काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांचा त्रास सोसावा लागणार आहे.

Web Title: Samsum on the street