Ratnagiri: साफ यिस्ट कंपनीला उत्पादन बंदची नाेटीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:53 IST2025-06-25T15:52:42+5:302025-06-25T15:53:12+5:30
विजेसह पाणीपुरवठा खंडित करण्याचेही आदेश

Ratnagiri: साफ यिस्ट कंपनीला उत्पादन बंदची नाेटीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
चिपळूण : गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफ यिस्ट कंपनीचे सांडपाणी टँकरद्वारे कामथे धरणात सोडल्याच्या प्रकाराची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. एमपीसीबीने साफ यिस्ट कंपनी व्यवस्थापनाला उत्पादन बंदची नोटीस बजावली आहे. याशिवाय कंपनीचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण व एमआयडीसीला देण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या कामथे धरणामध्ये २१ जून राेजी टँकरचे पाइप पाण्यात सोडून मळीसदृश सांडपाणी धरणात सोडल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीला आणला हाेता. याप्रकरणी टँकरचालकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एमपीसीबीने येथील पाण्याचे नमुने घेतले असून, चिपळुणातील अधिकारी कुलकर्णी यांनी याबाबत कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडे माहिती दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील एमपीसीबीचे विभागीय अधिकारी निखिल घरत यांनी साफ यिस्ट कंपनीला उत्पादन बंदची नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार, पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९७४ नुसार उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वारंवार अशा घटना घडत असून, त्यामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान झाल्याचा ठपका एमपीसीबीने ठेवला आहे. त्यानुसार उत्पादन सुरक्षितपणे थांबविण्याचे निर्देश एमपीसीबीने दिले आहेत. याशिवाय महावितरणचे कार्यकारी अभियंता व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांना वीज आणि पाणी खंडित करण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी या आदेशांचा पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
एमपीसीबीला आढळल्या त्रुटी
साफ यिस्ट उद्योगाने मंडळाच्या परवानगीशिवाय जास्त पाणी वापरले आहे. तसेच परवानगीशिवाय बॉयलर इंधन नमुना बदलला आहे. बॉयलरला दिलेला बॅग फिल्टर सुस्थितीत आढळला नाही. टँकरद्वारे सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे प्रदूषण झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांचे व्यवस्थापनाने पालन केलेले नाही. त्यामुळे साफ यिस्ट कंपनीला दोषी ठरविण्यात येत आहे.