दक्षिण आफ्रिकेमधील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या त्रिमूर्तींचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:44 IST2025-06-11T17:41:44+5:302025-06-11T17:44:01+5:30
रत्नागिरी व कोकणातील क्रीडाक्षेत्राला नवा आयाम

दक्षिण आफ्रिकेमधील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या त्रिमूर्तींचा इतिहास
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील धामापूरचे सुपुत्र प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये व मूळचे खेडमधील सध्या ठाणेस्थित सुरेश वेलणकर यांनी दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेतील पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर ११ तास ३० मिनिटांत पूर्ण करत कोकणचा झेंडा उंचावला. या यशाने रत्नागिरी व कोकणातील क्रीडाक्षेत्रात नवा इतिहास घडविला आहे.
कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वांत जुनी आणि प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन मानली जाते. या वर्षी स्पर्धेचे ९८वे वर्ष होते. पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर १२ तासांत पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते. तापमानात ५ ते २२ अंश सेल्सिअस इतका फरक, चढउतार आणि अनेक अडथळ्यांचा सामना करत प्रसाद देवस्थळी (११ तास, ३८ मिनिटे, ४९ सेकंद) आणि डॉ. गणपत्ये (११ तास, २४ मिनिटे, ४१ सेकंद) तसेच वेलणकर (९ तास, ४१ मिनिटे, ०८ सेकंद) यांनी वेळेत स्पर्धा पूर्ण करून पदक मिळविले.
गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक प्रसाद देवस्थळी सक्रिय धावपटू असून, देशभरातील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतात. कॉम्रेड्स मॅरेथॉन ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन होती. वैयक्तिक कामगिरी हा विषय नव्हता; पण अर्थातच मोठी मॅरेथॉन पूर्ण केल्याचे समाधान आहे. वैयक्तिक कामगिरीपेक्षा कोकणवासीयांना ही मोठी स्पर्धा कशी असते, हे समजावे यासाठी हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया देवस्थळी यांनी दिली. १३ जून रोजी त्यांचे आगमन रत्नागिरीत होणाऱ्या नागरी सत्कारासह जंगी स्वागत होणार आहे.
सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, गणपतीपुळे अल्ट्रामॅरेथॉन टीम आणि शेकडो धावपटूंनी त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे.
कोकणातील दुसरे यशस्वी सायकल व धावपटू
चिपळूणचे डॉ. गणपत्ये हे या शर्यतीत सहभागी झालेले कोकणातील दुसरे यशस्वी सायकल व धावपटू आहेत. त्यांनी याआधी लोहपुरुष किताब आणि सायकलिंगमध्ये एस. आर. किताब मिळवले आहेत. शेवटच्या ३० किलोमीटरमध्ये टाकलेले प्रत्येक पाऊल हे सहनशक्तीची परीक्षा घेणारे होते. प्रसाद आणि आपण ही स्पर्धा पूर्ण करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले धावपटू ठरलो, याबद्दल आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.