पूर्ण व्हायच्या आधीच राज्यातील महत्वाचा महामार्ग भेगाळला; मोठे तडे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:54 IST2025-06-25T13:53:17+5:302025-06-25T13:54:14+5:30
वाहतूकदारांना जीव मुठीत घेवून करावा लागतोय प्रवास

पूर्ण व्हायच्या आधीच राज्यातील महत्वाचा महामार्ग भेगाळला; मोठे तडे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
रत्नागिरी: रखडलेले काम, कामाचा दर्जा यामुळे मुंबई-गोवामहामार्ग कायमच चर्चेत राहिला आहे. दरम्यानच संगमेश्वरमध्ये तयार रस्त्याला मोठे तडे गेल्याने कामाच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होवू लागला आहे. आरवली पुलाजवळील काँक्रीटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून वेळीच उपापयोजना करण्याची आवश्यकता आहे.
राज्यात सद्या जोरदार पाऊस सुरु आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे मुंबई-गोवामहामार्गाचे काम संथ गतीने सुरु आहे. गेल्या अनेक वर्षापासून यामार्गाचे काम रखडले आहे. परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपायोजनांच्या दृष्टीने सुरु असलेले लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरु असतानाच गॅबियन वॉल घसरण्याचा प्रकार समोर आला आहे. चौपदरीकरणाअंतर्गत चिपळूण येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचा एक गर्डर कोसळला होता. परिणामी वाहतूकदारांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
अशातच, संगमेश्वरमध्ये तयार रस्त्याला मोठे तडे पाहायला मिळाले. आरवली पुलाजवळील काँक्रीटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी चार ते पाच इंचाच्या भेगा, तर काही ठिकाणी जवळपास अर्धा फुटाची भेग पडल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे या भेगा रुंदावण्याची शक्यता आहे. यामुळे अपघात घडू शकतात. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.