रत्नागिरीतील जगबुडी नदी धोका पातळीपर्यंत, नागरिकांमध्ये चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 11:47 IST2023-07-04T11:46:09+5:302023-07-04T11:47:20+5:30

गेले आठ दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे

Jagbudi river in Ratnagiri up to danger level | रत्नागिरीतील जगबुडी नदी धोका पातळीपर्यंत, नागरिकांमध्ये चिंता 

रत्नागिरीतील जगबुडी नदी धोका पातळीपर्यंत, नागरिकांमध्ये चिंता 

खेड : जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्या इशारा पातळी ओलांडून वाहू लागल्या असल्याने शहरातील व्यापारी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. सोमवारी (३ जुलै) दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने नदीच्या पाण्यात वाढ झाली असून, संध्याकाळी ५ वाजता नदीची पाणी पातळी ५.९० मीटरपर्यंत पोहोचली होती.

खेड तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे सकाळी १० वाजता जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळी ओलांडून ५.०५ मीटर झाली. पावसात सातत्य असल्याने दुपारी ३ वाजता पाण्याची पातळी ५.२० मीटर झाली होती. गेले आठ दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. जगबुडी नदीची इशारा पातळी ५ तर धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. रविवारी रात्री जगबुडी इशारा पातळीवर वाहत होती. मात्र, सोमवारी दुपारी जगबुडी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जाऊ लागल्याने खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चिंता वाढू लागली.

Web Title: Jagbudi river in Ratnagiri up to danger level