पाणीटंचाईची झळ, रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर धावला; खेडमध्ये काहींचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:20 IST2025-03-28T14:20:18+5:302025-03-28T14:20:18+5:30
रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात ...

पाणीटंचाईची झळ, रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर धावला; खेडमध्ये काहींचे स्थलांतर
रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात पाणीटंचाई तीव्र झाली असून, यावर्षीचा जिल्ह्यातील पहिला पाण्याचा टँकर तिथे धावला आहे. त्याचबराेबर चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यांतील काही गावांमधून पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू झाली आहे.
यावर्षी मोसमी पाऊस लांबल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी टिकून हाेती. परिणामी जिल्ह्यात पाणीपुरवठा करणारे टँकर उशिराने धावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एकही टँकर धावलेला नाही. फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीपातळी वेगाने खालावू लागली असून, ग्रामीण भागामध्ये तसेच डोंगराळ भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट दिसू लागले आहेत.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावातील चार वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसाला एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर काही ग्रामस्थ खासगी टँकरनेही पाणी विकत घेत आहेत. गतवर्षी एप्रिल महिन्यात टँकर सुरू झाला होता. यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे.
खेडमध्ये काहींचे स्थलांतर
खेड तालुक्यातील काही लोकांनी पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे स्थलांतर केल्याचेही पुढे आले आहे. दरवर्षी खेड तालुक्यात पहिला टँकर धावतो. मात्र, यंदा त्याची सुरुवात रत्नागिरी तालुक्यातून झाली आहे. तसेच जिल्ह्यात आणखी काही तालुक्यांतून टँकरची मागणी करण्यात आलेली आहे.
भाजीपाल्यावर परिणाम
गेल्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत घट झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या पिकावर झाला आहे. भाज्यांचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेतील भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
बंधाऱ्याचे उद्दिष्ट निम्मेही नाही
यावर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिशन बंधारे हे अभियान राबविण्यात आले आहे. यामध्ये श्रमदानातून विविध बंधारे उभारण्यात आलेले आहेत. मात्र, यंदा बंधाऱ्याचे उद्दिष्ट निम्मेही पूर्ण झालेले नाही.