रत्नागिरीत वर्षभरात गुन्ह्यांमध्ये घट, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णींनी दिली माहिती
By शोभना कांबळे | Updated: January 22, 2025 19:24 IST2025-01-22T19:08:59+5:302025-01-22T19:24:24+5:30
आर्थिक गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान

रत्नागिरीत वर्षभरात गुन्ह्यांमध्ये घट, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णींनी दिली माहिती
रत्नागिरी : २०२३-२४ या वर्षापेक्षा २०२४-२५ या आर्थिक वर्षात २३८ गुन्हे घटले आहेत. घटलेल्या गुन्ह्यांमध्ये घरफोडी, चोरी, दंगा, आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांमध्ये घट होण्यात मदत झाली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
जिल्हा पोलिस दलाच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी पत्रकारांसमोर मांडला. ते म्हणाले की, यावर्षी क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग या योजनेमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. खासगी व्यावसायिक आणि सरकारी आस्थापना यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार खासगी ३१२१ कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे एकूण १३८८ दाखल गुन्ह्यांपैकी ११२१ गुन्हे उघड होण्यास मदत झाली असून, ८० टक्के गुन्हे उघड झाले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे प्रयत्न असल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज
खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आराेपीचा पाठपुरावा करण्यासाठी, त्याचा माग काढण्यासाठी, शोध घेण्यासाठी तसेच चेहरेपट्टीची ओळख पटविण्यासाठी मदत होते. तसेच तांत्रिक बाबींची उकल होण्यास मदत होते. गुन्ह्यांचे प्रमाण अधिक घटण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूण आणि दापोली या शहरांमध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत डीपीडीसीकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याची तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच या दोन्ही शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील आणि तिथेसुद्धा रत्नागिरीसारखे सीसीटीव्हीचे जाळे उभारले जाईल, असेही ते म्हणाले.
आर्थिक गुन्हेगारी रोखणे मोठे आव्हान
आर्थिक गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, त्यासाठी सातत्याने जिल्हा पोलिस दल जनजागृतीपर कार्यक्रमांवर भर देत आहे. यात काही आरोपी परराज्यात, तर काही परदेशात राहून गुन्हेगारी करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, हाच महत्त्वाचा मार्ग आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो, असेही पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. तसेच गुन्ह्यांमध्ये आरोपीचा माग काढण्यासाठी डाॅग स्काॅडचा महत्त्वाचा उपयोग होत असल्याचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.