दापोली : तालुक्यातील जालगाव येथील एका २२ वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींच्या त्रासाला व छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेच्या भावाने दापाेली पाेलिस स्थानकात केली आहे. या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंकीदेवी धर्मेंद्रकुमार धामिन (मूळ रा. बलिया, झारखंड, सध्या रा. जालगाव दापाेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने १३ जून राेजी राहत्या घरी ओढणीच्या साहायाने गळफासाने आत्महत्या केली हाेती. तिचे पती बुराेंडी येथून कामावरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला हाेता. याबाबत दापाेली पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती.मात्र, तिच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ वीरेंद्रकुमार जनार्दन पंडा (वय ३४, रा. बलिया, झारखंड) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पिंकीदेवीला सासरच्या लोकांकडून सतत पैशांची मागणी, शिवीगाळ, धमकी आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. हा छळ ९ नोव्हेंबर २०२३ ते १३ जून २०२५ या कालावधीत सुरू होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून पिंकीदेवीने आत्महत्या केल्याचे भावाने म्हटले आहे.भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती धर्मेंद्रकुमार धामिन, दीर राजेशकुमार धामिन, सासू (नाव माहीत नाही) आणि सासरे रामदेव धामिन यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (१), ३५१ (२), ३(५) अन्वये १६ जून राेजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील संशयित आराेपी धर्मेंद्रकुमार व राजेशकुमार हे सध्या जालगाव (ता. दापोली) येथे वास्तव्याला आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.
सतत पैशांची मागणी, शिवीगाळ अन् मानसिक छळ; विवाहितेने संपवले जीवन, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:54 IST