मोठा अनर्थ टळला! साखरपा येथे खासगी आराम बस जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:58 IST2026-04-03T08:57:34+5:302026-04-03T08:58:09+5:30
सुदैवाने या आराम बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, मोठा अनर्थ टळला...

मोठा अनर्थ टळला! साखरपा येथे खासगी आराम बस जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडीजवळील गद्रे पेट्रोल पंपासमोर खासगी आराम बस जळून खाक झाली. ही घटना आज पहाटे ३:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने या आराम बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, मोठा अनर्थ टळला.
चालक गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) प्रवासी आराम बस (एनएल ०१, बी २४४२) पुणे येथून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीस प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे जात होते. आज पहाटे साडेतीन वाजता संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर गाडी आली असता गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून सर्व प्रवाशांना गाडीच्या बाहेर काढले. सर्व तीस प्रवासी सुखरूप असून, कोणालाही दुखापत झालेली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.
देवरूख येथील अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत गाडी पूर्णतः भस्मसात झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेडकॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून प्रवाशांना सहकार्य केले.