Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:57 IST2025-06-19T14:57:03+5:302025-06-19T14:57:51+5:30
Rains News Marathi: मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, नद्यांना पूर आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
Rains Update Marathi: रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी रात्री आणि गुरूवारीही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कुंडलिका, पाताळगंगा नदीसह आणि एका नदीला पूर आला आहे. दरम्यान, प्रशासनाने कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून रायगड जिल्ह्यातील तीन पर्यटन ठिकाणी जाणयास बंदी घातली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूरमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. इतर भागातही अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला असून नद्यांना पूर आला आहे.
कोणत्या नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
रायगड जिल्ह्यातील अंबा नदी (नागोठणे बंधारा), कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीलाही पूर आला असून, अजून धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. उल्हास नदी आणि गाढी नदीही धोक्याच्या पातळीपेक्षा कमी आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पर्यटकांना वेसण, या ठिकाणी जाण्यास बंदी
रायगड जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पाईंट आणि ताह्मिणी घाट येथे जाण्यास बंदी घातली आहे. १७ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत ही बंद असणार आहे. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात होणारे अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रोडवरून पाणी जात असल्यामुळे पाली-वाकण रोड वाहतुकीस बंद केला आहे..#Traffic_alert#Rain#RainAlert@mitocondalal@InfoRaigad@DGPMaharashtrapic.twitter.com/qMxTIMkIJn
— रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice) June 19, 2025
रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
मागील काही तासांपासून होत असलेला अतिमुसळधार पाऊस आणि हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पण, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहून दिलेल्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.