Maharashtra Election 2019 : मतदान; लोकशाहीचा दीपोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 11:47 PM2019-10-20T23:47:53+5:302019-10-21T06:16:08+5:30

Maharashtra Election 2019 : राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीचा दीप तेवत ठेवावा, अशी भावना वाचकांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Election 2019 :  Voting; The lamp of democracy! | Maharashtra Election 2019 : मतदान; लोकशाहीचा दीपोत्सव!

Maharashtra Election 2019 : मतदान; लोकशाहीचा दीपोत्सव!

Next

राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीचा दीप तेवत ठेवावा, अशी भावना वाचकांनी व्यक्त केली आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी आॅनलाइन सुविधा, दंडाची तरतूद आणि शेवटी सक्ती, या उपाययोजना आहेतच. परंतु केवळ समाजसेवेचा पिंड असणारे ‘सच्चे उमेदवार’ देणे, हे देखील आवश्यक आहे. मतदारांनी लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन करुन मतदान केल्यास लोकशाही नक्कीच बळकट होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

वंदनीय चारित्र्यवान कोण?

खरे तर, निवडणुकांचा निव्वळ बाजार भरल्याचे दृश्य पाहुन,अनेक सुज्ञ नागरिक मुद्दामहून मतदानासाठी जात नसल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. आचारविचारांची संहिता नसते. ‘सत्तातुरानाम न लज्जा न भयम’ अशी नेत्यांची राजकीय शैली..! बिनबुडाचे आरोप, सुडबुद्धीचे राजकारण, असंस्कृतपणाचे हावभाव,अश्लाघ्य टीका, विकासाची तळमळ नाही, भ्रष्टाचार, मंदीची होरपळ असूनही सरकार अलबेल असल्याचे नाट्य रंगवणे, आणि वंदनीय चारित्र्याचा अभाव असल्याने कुणास मतदान करावे? मतदानाचा टक्क कमी होण्याचे, हेच एक कारण असावे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अशिक्षित, गोरगरीब लोकं आहेत. डोंगरदऱ्यात, लहान लहान वाड्या-तांड्यांवर ते राहतात. त्यामुळे मतदानाची सक्ती नकोच. आॅनलाईन मतदानाची कल्पना वरवर चांगली वाटत असली तरी, त्यातूनही गुंडागर्दी अधिक वाढेल. आपल्या देशात बाहुबली नेत्यांची कांही कमी नाही. एका खोलीत बंद करून मतदान करून घेण्याची सक्ती होणार नाही, याची शाश्वती कोण देणार?
- डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, चिकलठाणा, औरंगाबाद.

मतदारांचे परिवर्तन करा

आपण मतदान केल्याने देशात काहीच फरक पडत नाही. कोणाचेही सरकार आले तरी आपल्या परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नकारात्मकता वाढते. सरकारी व खाजगी कर्मचारी सुस्त असतात. बाकी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. हे आता सर्वश्रुत झाले आहे. हुशार तरुणही नोकरी शोधत आहेत अशा बेरोजगार तरुणांमध्ये भवितव्याबद्दल नैराश्य आले आहे. निवडणुकीत उभे असलेल उमेदवार हे पिढ्यान्पिढ्या तेच आहेत किंवा त्यांच्या घरातीलच आहेत. फक्त पक्ष बदलला जातो. पैशाच्या जोरावर निवडून येणे आणि निवडून आल्यावर त्याची भरपाई करणे आणि पुढील निवडणुकीची तरतूद करणे असे चक्र सुरू आहे. अशांबद्दल जनतेच्या मनामध्ये तीव्र नाराजी आहे. तरीही लोक राष्ट्रीय कर्तव्य चुकवत नाहीत, पण उमेदवारांनीही जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या किंवा वास्तवाचे भान सतत ठेवले तर जनताही सक्ती न करता मतदान करेल. त्यांच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडेल. म्हणून सक्ती न करता परिवर्तन करणे गरजेचे आहे. मतदान म्हणजे मताचे दान आहे. दानासाठी सक्ती करता येणार नाही.
- तात्याबा गणपती जाधवर, श्रीरामनगर, खेडशिवापूर, ता. हवेली, जि. पुणे.

उमेदवार चांगले द्या

भारताची लोकशाही प्रणाली जपण्याची कुणाला आवड नाही, असे नाही. पण निवडणुकीतील वातावरण इतके गलिच्छ असते की कुणाला मतदान करावे हेच जनतेला कळत नाही. त्याचबरोबर प्रचारातील मुद्दे, आश्वासने, प्रचार करणाºया कार्यकर्त्यांची व्यसने, प्रलोभने या बाबी किळसवाण्याच असतात. आपल्या समस्या सुटत नाहीत हे जनतेने अनेकवेळा अनुभवले आहे. उमेदवारच असे द्या की लोकांनी खास त्यांच्यासाठी मतदानाला आले पाहिजे. मतदान सक्तीचे करण्याऐवजी चांगले उमेदवार द्या

- विकास जिजाबा पवार, भिकमचंदनगर, पिंप्राळा रोड, जळगाव.

मतदारांनाही भत्ता द्या

देशाचे भवितव्य घडवणाºया मतदारास दुर्लक्षिले जाते. आपला रोजगार बुडवून तो मतदानासाठी येतो. मतदानामुळे ज्यांचा एक दिवसाचा रोजगार बुडतो त्यांना भत्ता दिला जात नाही. म्हणून मतदारांस एका दिवसाचा भत्ता म्हणून रोख २०० रूपये दिले पाहिजेत. मतदान झाल्याबरोबर त्या टेबलावरच भत्ता वाटप झाले पाहिजे, अशी सूचना निवडणूक आयोगाला कराविशी वाटते. ह्याची तरतूद रोजगार हमी योजनेत हवी. त्यामुळे ॅमतदानाचा टक्का हमखास वाढेल.
- पी. एन. धसाडे,भारती निवास, उमरी, जि. नांदेड.

Web Title: Maharashtra Election 2019 :  Voting; The lamp of democracy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.