रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यांत सवलती लागू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 13:29 IST2018-10-30T13:10:27+5:302018-10-30T13:29:31+5:30

राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन हे तीन तालुक्यांचा समावेश आहे.

Drought in Raigad district | रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यांत सवलती लागू 

रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यांत सवलती लागू 

जयंत धुळप

अलिबाग - राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन हे तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने उपाययोजना व सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सन  2018-19  च्या खरीप हंगामातील पाहणी निकषांनंतर लागू झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, श्रीवर्धन या तीन तालुक्यांत शासनाने 23 ऑक्टोबर रोजी शासन निर्णयाद्वारे दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. त्यानुसार या तीन तालुक्यात जमीन महसूल सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीत स्थगिती, कृषीपंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर,  टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या  सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूयवंशी यांनी तीनही तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले असल्याचे सांगितले.

"लाेकमत"ने सातत्याने रायगड जिल्ह्यातील शेती नुकसानी व दुष्काळी परिस्थिती बाबत पाठपुरावा केल्यामुळेच या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळू शकला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील पिक नुकसानीचा ग्राऊंड सर्वे हाेऊन नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याकरिता जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी श्रमिक मुक्ती दल शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी केली आहे.
 

Web Title: Drought in Raigad district