शिंदेसेनेला मोठा धक्का! ७ नगरसेवक ठरले अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:59 IST2026-01-30T10:56:56+5:302026-01-30T10:59:30+5:30
पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून गटनेते संजय कर्णिक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता.

शिंदेसेनेला मोठा धक्का! ७ नगरसेवक ठरले अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, प्रकरण काय?
रायगड - म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या ७ नगरसेवकांना पक्षात घेत मंत्री भरत गोगावले यांनी मोठी खेळी केली होती. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पक्षांतर बंदीच्या कायद्यातंर्गत या नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदेसेनेला मोठा धक्का मानला जातो.
काही महिन्यांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक शिंदेसेनेत दाखल झाले होते. या घटनेमुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून गटनेते संजय कर्णिक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या ७ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका या नगरसेवकांवर ठेवला आहे.
कोणावर झाली अपात्रतेची कारवाई?
नगराध्यक्ष फरहिन अजीज बशरत
कमल रवींद्र जाधव
मेहजबिन नदीन दळवी
असहल असलम कादिरी
सुमैया कॉसम आमदानी
कादीर म्हसलाई
शाहीद जंजिरकर
तटकरे-गोगावले संघर्ष
रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला संघर्ष कायम चर्चेत आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. म्हसळा तालुक्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे नगर पंचायतीचे राजकारण रंगतदार बनलं होते. याठिकाणी नगराध्यक्षांसह ७ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला होता. मंत्री गोगावले यांनी स्वतः नगर पंचायत कार्यालयात जाऊन नगराध्यक्षा फरहीन बशरत यांना त्यांच्या आसनावर बसवले होते. यावेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र आता या ७ नगरसेवकांना अपात्र केल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीतील नगरसेवकांची पळवापळवी थांबणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.