Zilla Parishad Election: दौंड तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे वारे; वरवंड–पारगाव गटात घरातीलच तिकिटासाठी चुरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 10:09 IST2026-01-21T10:09:02+5:302026-01-21T10:09:39+5:30
नव्या इच्छुकांसह अनुभवी व जुने दिग्गजही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

Zilla Parishad Election: दौंड तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे वारे; वरवंड–पारगाव गटात घरातीलच तिकिटासाठी चुरस
वरवंड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच दौंड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून, नव्या इच्छुकांसह अनुभवी व जुने दिग्गजही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
गावपातळीवर बैठका, संपर्क दौरे, कार्यकर्ता मेळावे सुरू झाले असून वातावरण तापू लागले आहे. प्रत्येक पक्ष आणि गट आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रणनीती आखत आहे. दुसरीकडे मतदारही संभाव्य उमेदवारांचे सामाजिक कार्य, विकासकामे आणि जनसंपर्क यांची बारकाईने पडताळणी करताना दिसून येत आहेत.
दौंड तालुक्यात जिल्हा परिषदचे एकूण सात गट तर पंचायत समितीचे चौदा गण आहेत. यंदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काही इच्छुकांना आरक्षणामुळे माघार घ्यावी लागली आहे, तर काही ठिकाणी अनुकूल आरक्षण निघाल्याने अनेकांनी निवडणुकीसाठी ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधले आहे.
तालुक्यातील केडगाव आणि वरवंड गटाकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. या गटांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाला डावलले जाणार, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून, उमेदवारी जाहीर होईपर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, यंदाच्या निवडणुकीत जातीय व सामाजिक समीकरणांसोबतच स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि रोजगार यासारखे मुद्दे निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत दौंड तालुक्यात चुरशीची राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
घरातीलच तिकिटासाठी चुरस
वरवंड–पारगाव गटामध्ये वरवंड येथून एकाच घरातील तीन इच्छुक उमेदवार असल्याने मोठी राजकीय कसोटी पाहायला मिळणार आहे. नक्की तिकीट कोणाला मिळते आणि निवडणुकीत बाजी कोण मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.