Zilla Parishad Election: जिल्हा परिषदेच्या गटांमधून १०, तर पंचायत समितीच्या गणांमधून १२ उमेदवारांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:48 IST2026-01-24T09:48:26+5:302026-01-24T09:48:50+5:30
उमेदवारी अर्ज माघारीसाठी मिळणार केवळ दोन दिवसच

Zilla Parishad Election: जिल्हा परिषदेच्या गटांमधून १०, तर पंचायत समितीच्या गणांमधून १२ उमेदवारांची माघार
पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात शुक्रवारी (दि.२३) गटांमधून १०, तर गणांमधून १२ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. रविवार व सोमवारी सुटी असल्याने अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवार (दि. २७) आहे. त्यामुळे माघारीसाठी केवळ दोन दिवसच मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या ७३ गणांसाठी एकूण ६२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १२२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. अर्ज माघारी घेण्यास शुक्रवारी (दि.२३) सुरुवात झाली. जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ७ गणांसाठी ९५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी चार जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच भोर आणि बारामती तालुक्यांतून प्रत्येकी एक उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे.
दरम्यान, दौंड तालुक्यातून पंचायत समितीच्या १४ गणांसाठी १२७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच इंदापूर तालुक्यातून ३, तर शिरूर, खेड आणि वेल्हा तालुक्यांतून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे.
यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी ६११, तर पंचायत समितीसाठी १ हजार ११० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवार आहे. मात्र, रविवारी (दि. २५) आणि सोमवारी (दि. २६) सार्वजनिक सुटी असल्याने त्या दिवशी अर्ज माघारी घेता येणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी शनिवार (दि. २४) आणि मंगळवार (दि. २७) असे केवळ दोनच दिवस उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणात नेमके कोणते उमेदवार राहणार, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.