गवंड्याचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक, प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 00:52 IST2019-03-17T00:50:53+5:302019-03-17T00:52:39+5:30
पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठराविश्वं दारिद्र्य, गावातही शिक्षणाचा अभाव, वडिलोपार्जित चार एकर शेती, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण या सर्वांवर मात करत मिळवले यश

गवंड्याचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक, प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश
कान्हूरमेसाई - पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठराविश्वं दारिद्र्य, गावातही शिक्षणाचा अभाव, वडिलोपार्जित चार एकर शेती, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण; मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही, पोरांना शिकवणं, त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून वडिलांनी शेतीबरोबरच गवंडी काम करत चार पैसे गाठीला बांधून दगडूभाई तांबोळी यांनी अमजदला चांगलं शिक्षण दिले आणि त्याचे चीज करीत अखेर अमजदनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि गवंड्याच्या पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश पाहून सारा गाव गहिवरून गेला.
ही कहाणी आहे अमजद दगडूभाई तांबोळी या तरुण तडफदार आणि तितक्याच सहनशील आणि चिकाटीवृत्तीच्या मुलाची आणि त्याच्या जिद्दी वडिलांची. शिरूर तालुक्यातील जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या मुखई येथील सामान्य गवंडी काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने जिद्दीच्या जोरावर उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसनी घातली.
घरातील तुटपुंजी शेती असताना त्यात मेहेनत करून त्याचा जोड म्हणून गवंडी काम करत दगडू यांनी अमजदचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. बारावीनंतर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून अमजद यांनी बीएस्ससी अॅग्री पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील राहुरी येथे २ वर्षे एमएस्ससी अॅग्री पदवी घेतली आणि त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत थेट चौदावा क्रमांक मिळविला.
घरात दोन वेळ खायची वाणवा, असे दिवस काढलेल्या अमजद यांनी मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण तर पूर्ण केलेच; मात्र तब्बल बारा-बारा तास अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळविले.
परिस्थिती इतकी बिकट होती दहावी-बारावीतच नव्हे, तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतानाही मला खासगी शिकवणी लावता आली नाही; मात्र शिकवणी असेल तरच यश मिळते असे नाही, तर स्वंयशिस्त आणि अभ्यासाचे नियोजन चांगले असेल तर नक्की यश मिळते.
- अमजद तांबोळी