राज्यात मनसेची सत्ता येईल का?; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "आम्ही कायमच चांगल्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 16:47 IST2022-08-21T16:46:42+5:302022-08-21T16:47:45+5:30
सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, मंत्रिमंडळावर बोलताना शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य.

राज्यात मनसेची सत्ता येईल का?; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "आम्ही कायमच चांगल्या..."
“आम्ही काय चांगल्या इच्छा व्यक्त करतो. इतक्या वर्षात मुंबईतील, महाराष्ट्रातील रस्ते झाले नाही, पाण्याचे प्रश्न सुटले नाहीत. स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, या गोष्टीच केव्हाच व्हायला हव्या होत्या. आपण मोठ्या प्रमाणात कर देतो. महाराष्ट्राची कोणती हद्द ओलांडा रस्ते गुळगुळीत दिसतात. खड्डे आपल्याकडेच दिसतात. चांगलं सरकार हवं असेल तर बदल घडवायलाच पाहिजे,” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. राज्यात मनसेची सत्ता येईल का असा सवाल त्यांना करण्यात आला होता.
"गणपती आमचा, किंमत तुमची - २०२२" या मनसे शहर संघटक प्रल्हाद गवळी आयोजित उपक्रमाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्हाला भेटी देऊन उपयोग नाही. लोकांच्या समस्या सुटल्या तर आम्हाला आनंद आहे. आमच्याकडे कोणीही समस्या घेऊन आलं तर राज ठाकरे आपणहून जाऊन त्याची कल्पना देत असल्याचंही त्या म्हणाल्या.
मंत्रिमंडळावरही भाष्य
“सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. काही सणवार सुरू झालेत, विधानसभा अधिवेश सुरू झालं, त्यांच्याकडे फाईल्स येऊ दे, काम तर सुरू होऊ दे. आपण दोन महिने तर थांबूया. घोड्यावर बसल्यावर लगाम धरायला थोडा तर वेळ लागतो,” असंही त्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.