सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली असताना त्यांनी भूमिका का बदलली? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल
By नितीन चौधरी | Updated: June 29, 2023 18:17 IST2023-06-29T18:17:15+5:302023-06-29T18:17:29+5:30
सत्तेसाठी आपण कुठेही जाऊ शकतो याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस

सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली असताना त्यांनी भूमिका का बदलली? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल
पुणे: 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माझी भेट घेतली होती. त्यात सरकार भरण्याची चर्चाही झाली होती. मात्र दोन दिवसांनी मी भूमिका बदलल्याचे ते म्हणत आहेत. भेटीनंतर आणखीन दोन दिवसांनी त्यांनी चोरून शपथ का घेतली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा होता तर मग सत्ता का गेली. असा प्रश्न उपस्थित करत सत्तेसाठी ते काही करायला तयार असतात. आणि हे समाजासमोर यावे यासाठीच नंतरची खेळी खेळली असा गौप्यस्फोटही पवार यांनी यावेळी केला. त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय वक्तव्य करण्याऐवजी राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे गांभीर्याने बघावे असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर पवार यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. सरकार स्थापनेबाबत फडणवीस व माझ्या चर्चा झाली होती मात्र दोन दिवसांनी भूमिका बदलत त्यांनी चोरून शपथ का घेतली असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांना सत्य शिवाय काही दिसत नाही असा टोला त्यांनी लगावला. सत्तेसाठी आपण कुठेही जाऊ शकतो याचे उदाहरण फडणवीस असल्याचे सांगत त्यांचा हात बुरखा पाडण्यासाठीच समाजासमोर वस्तुस्थिती यावी या उद्देशाने महाविकास आघाडीची खेळी खेळण्यात आली असे स्पष्टीकरणही पवार यांनी यावेळी दिले. मी क्रिकेट खेळत नसलो तरी माझे सासरे सदु शिंदे हे भारतीय क्रिकेट संघात गुगली बॉलर म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्याकडून मी क्रिकेटमध्ये गुगली टाकण्यास शिकलो नाही. मात्र राजकीय राजकारणात गुगली कशी टाकावी व विकेट कशी काढावी हे मात्र शिकलो. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीनंतर कुणाची विकेट गेली हे सर्वश्रुत आहे असेही ते म्हणाले.