Sharad Pawar: क्षेत्र काेणतेही असाे, संधी मिळाली तर, महिला त्याचं सोनं करतील - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 10:06 IST2026-04-09T10:06:15+5:302026-04-09T10:06:31+5:30
राज्यकारभार असो की प्रशासन, साहित्य-कला-संस्कृती आणि लष्करातही महिलांची कामगिरी देशाला अभिमान वाटावी अशीच आहे

Sharad Pawar: क्षेत्र काेणतेही असाे, संधी मिळाली तर, महिला त्याचं सोनं करतील - शरद पवार
पुणे: क्षेत्र काेणतेही असाे, संधी मिळाली तर त्याचे सोने करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. त्या कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाहीत. याचा अनुभव मी वेळोवेळी घेतला आहे म्हणूनच राज्यकारभार असो की प्रशासन, साहित्य-कला-संस्कृती आणि लष्करातही महिलांची कामगिरी देशाला अभिमान वाटावी अशीच आहे, असे उद्गार माजी कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी बुधवारी (दि. ८) पुण्यात काढले.
दिल्ली येथे दि. ११ व १२ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या https://sahityasammelan.sarhad.in/ या संकेतस्थळाचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी संयोजन समितीतील डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, कविता वानखेडे, निर्मला नलावडे, डॉ. संगीता शिंदे, मनीषा वाडेकर, सुजाता गोळे, गीता खोत, पल्लवी पासलकर, सोनाली निवंगुणे, नीलेश भिंगारे, हर्षवर्धन पासलकर, प्रीतम पानसरे, अवेस शेख, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते.
पवार म्हणाले की, महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरच्या उत्तम महिला प्रशासक म्हणून ख्यातनाम आहेत. त्यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त सरहद संस्थेच्या पुढाकाराने होणारे हे शासकीय तसेच प्रशासकीय महिलांचे साहित्य संमेलन पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. महाराणी ताराराणी यांच्या नावाने होणाऱ्या या संमेलनात त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभार सांभाळण्याची हातोटी याची आठवण हाेईल. ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे.
आता संसदेतही महिलांना आरक्षण देण्याचे बिल येणार आहे. या संधीची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून केली आणि महिलांना संपत्तीत मिळणारा वाटा असो की प्रशासकीय, राजकीय नेतृत्व असो महिला कुठेही मागे नाहीत हे आता सिद्ध झाले आहे. हे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे, याचा मला अभिमान वाटतो. या धोरणानंतर महिला सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे नेतृत्व करताना दिसत आहेत. म्हणूनच या शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातून होणारे विचारमंथन समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, असेही ते म्हणाले.