हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 19:16 IST2020-05-07T19:08:13+5:302020-05-07T19:16:46+5:30

ही दु:खदायक भावना आहे अलाहाबादला पायी चालत जाणाऱ्या मजुराची...

We are walking home, but will not return | हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे..

हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे..

ठळक मुद्देपरप्रांतीय मजुरांची व्यथा : गावाला जाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

भानुदास पऱ्हाड - 
शेलपिंपळगाव : कोरोना संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात 'लॉकडाऊन'चा तिसरा टप्पा सुरू आहे. मागील ४९ दिवसांपासून राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने तब्बल ४८ दिवस पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते. परिणामी परप्रांतीय मजुरांचे हातचे काम बंद झाल्याने परवड टाळण्यासाठी त्यांनी आपापल्या गावी पायी पळ काढला आहे. "हम तो अपने गाव पैदल जा रहे है, लेकीन फिर कभी लौट के वापस नही आएंगे अशी दु:खदायक भावना अलाहाबादला पायी चालत जाणाऱ्या मजुराने  व्यक्त केली. 
    जिल्ह्यात पिंपरी - चिंचवड, चाकण, रांजणगाव, सणसवाडी आदी ठिकाणी महत्वाच्या शेकडो औद्योगिक वसाहती आहेत. अशा वसाहतींमध्ये मॅनपॉवरही मोठ्या प्रमाणात लागत असल्याने स्थानिक कामगारांव्यतिरिक्त परप्रांतीय कामगारांची मोठी झुंड याठिकाणी कार्यरत होती. मात्र मार्च महिन्यात राज्यात कोरोना व्हायरसची साथ आली. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित करून जिल्ह्यात जमावबंदी लागू केली.


           त्यानंतर केंद्र सरकारनेही संपूर्ण देशात 'लॉकडाऊन' जाहीर केले. परिणामी परप्रांतीय मजुरांची कामाविना पोटाची परवड होऊ लागल्याने राज्यशासनाने पुढाकार घेऊन अशा गरजूंना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तर अनेक सेवाभावी संस्थाही अशा लोकांना किराणा किटचे वाटप करत आहेत. मात्र कोरोना संसगार्चा धोका कमी होत नसल्याने सद्यस्थितीत देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. परिणामी चाकण, पिंपरी चिंचवड, सणसवाडी, रांजणगाव आदी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी पायी चालत आपापल्या घराची वाट पकडली आहे. 
  सध्या चाकण - शिक्रापूर, पुणे - नगर, पुणे - नाशिक, चाकण - तळेगाव महामार्गाव्यतिरिक्त अशा मार्गांना जोडणाऱ्या विविध रस्त्यांवरून परप्रांतीय मजुरांचे लोंढेच्या - लोंढे पायी चालत निघाले आहेत. गुरुवारी (दि.७) अशाच काही पायी चालत अलाहाबादला निघालेल्या दहा - पंधरा परप्रांतीय मजुरांशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, कंपनी बंद ठेवल्याने त्यांनी कामावरून काढले... ठेकेदाराने वाऱ्यावर सोडले... खोली भाडं देणे शक्य नसल्याने रूममालकाने खोल्या खाली करून घेतल्या... शासनाकडून आवश्यक सुविधा मिळेना... परिणामी गावाला जाण्याचा निर्णय घेतला...शारीरिक चाचण्या करून घेतल्या...मात्र आठ दिवस उलटूनही त्याचे अहवाल मिळेना.... अखेर पाच दिवसांपूर्वी मावळमधून पायपीट सुरू केली.... नाशिकला काहीतरी उपाययोजना होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 
................
कामगारांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी चाकण औद्योगिक वसाहतींमधील अनेक कारखाने दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र कारखाने सुरू होऊनही हजारो परप्रांतीय मजूर आपापल्या गावाला जात आहेत. एकंदरीतच परप्रांतीय मजुरांची काम करण्याची मानसिकता नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

Web Title: We are walking home, but will not return