महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
By राजू हिंगे | Updated: June 25, 2025 12:37 IST2025-06-25T12:34:10+5:302025-06-25T12:37:36+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ मे ते १५ जून या एका महिन्याच्या कालावधीत सहा वेळा पुणे दौऱ्यावर आले आहेत

महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
पुणे : महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याच्या दक्षतेसाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून म्हणजे उपमुख्यमंत्री असताना फडणवीस हे सातत्याने पुण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या पुण्याच्या दौऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका महिन्यात किमान पाच ते सात वेळा फडणवीस हे पुण्यात येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावरील विशेष लक्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभेची २०२४ निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. त्यावर माझे पुण्यावर विशेष प्रेम आहे; पण लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे फडणवीस यांनी पुण्यात जाहीर केले होते. उपमुख्यमंत्री असतानाही फडणवीस यांचे पुणे दौरे वारंवार होत असत. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात कलगीतुरा रंगला होता. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना डावलून अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. पुणे महापालिकेत २०१७ साली भाजपची एकहाती सत्ता होती. त्यानंतर २०२२ नंतर महापालिकेत प्रशासकराज आहे. त्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार युतीचा निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले आहे. त्याने पुणे महापालिकेची आगामी निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र लढविण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. भाजपचे चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने सहा आमदार, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, विधान परिषदेवर योगेश टिळेकर आहेत. केंद्रात सहकार राज्यमंत्री, राज्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पुणे शहरात आहे. त्यामुळे पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बापू पठारे आमदार आहेत. पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे आहे. अजित पवार हे कार्यकर्त्यांना अधिक ताकद देतात. अजित पवार यांचा कामाचा झपाटा अधिक आहे. पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याची दाट शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमापासून ते मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने येत आहेत.
३६ दिवसांत ९ वेळा पुणे दौरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ मे ते १५ जून या एका महिन्याच्या कालावधीत सहा वेळा पुणे दौऱ्यावर आले आहेत. १५ मे रोजी यशदा येथे राज्यातील महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पालिका आयुक्तांचा आठजणांचा गट करून प्रत्येकाशी संवाद साधला होता. त्यानंतर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी २१ मे रोजी पुण्यात आले होते. त्यानंतर ३० मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० जयंतीनिमित्त युवा प्रेरणा संवाद आणि प्रशांत पोळ लिखित खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. पुणे ॲग्री हॅकेनाॅथचे पारितोषिक वितरण व समारोप समारंभ आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा ३ जून रोजी झाला. फडणवीस यांच्या हस्ते पैलतीरावरून... तर असं झालं या पुस्तकाचे प्रकाशन ७ जून रोजी झाले. औंध येथील महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ८ जून रोजी झाले. त्याच दिवशी जिल्ह्यात चार ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कार्यक्रम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ जून रोजी पुण्यात आले होते. त्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस देहू येथे आले होते. २० जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रात्री पुण्यात येउन संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दर्शन घेतले. त्या दिवशी त्यांच्या मुक्काम पुण्यात होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस हे पुणे विद्यापीठातील वारकरी भक्ती योग या कार्यक्रमास हजर होते.